नवी दिल्ली : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील नरसापूर इंडस्ट्रियल भागात असलेल्या तायवान कंपनीच्या कारखान्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. wistron नावाची ही कंपनी भारतात जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या आयफोनचं उत्पादन करते. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा पगार दिलेला नाही. अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला राग कंपनीत तोडफोड करुन काढला आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमध्ये कंपनीचं थोडं थोडकं नाहीतर तब्बल 437 कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी १२५ जणांना अटक केली आहे.
1/4 #Violence at @Apple #iPhone production plant run by Taiwan-based #Wistron Corp at Narasapura near #Bengaluru in India
Nearly 2,000 employees, alleged not been paid, went on a rampage destroying the company’s furniture, assembly units and even attempted to set fire to vehicles pic.twitter.com/qtlHyJiRAh— Crisbin Joseph Mathew (@CrisbinJoseph) December 12, 2020
कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यामध्ये कर्मचारी काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बॅटरीला आग लावण्यात आली. याशिवाय सुरक्षारक्षक आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पूर्ण पगार दिला जात नसून अतिरिक्त काम करण्याची सक्ती केली जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. कंपनीने मात्र आरोप फेटाळला असून कामगार कायद्याचं पालन करण्यास कटिबद्द असल्याचं म्हटलं आहे. करोना संकटातून बाहेर येत राज्यात आर्थिक गुंतवणूक येण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे नवी अडचण निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी आम्ही या हिंसाचाराच निषेध करतो असं मह्टलं आहे. तसंच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.