नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेतील आयफोन निर्माण करणाऱ्या ऍपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. या उत्पादन प्रकल्पात आता अत्याधुनिक आयफोन- 14 चे उत्पादन होणार आहे.
हा फोन केवळ भारतातील ग्राहकासाठी नाही तर जागतिक ग्राहकासाठी तयार केला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 2017 पासून या कंपनीचे भारतात उत्पादन चालू असून आता ऍपलचे बहुतांश फोन भारतात तयार होतात. या महिन्याच्या सुरुवातीला आयफोन -14 हा फोन या कंपनीने जागतिक बाजारात सादर केला.
यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. फॉक्सकॉन कंपनी ऍपलसाठी तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर या ठिकाणी आयफोनची निर्मिती करते. या ठिकाणी आता आयफोन- 14 चे उत्पादन होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
त्यासंदर्भात वृत्तसंस्थांनी ऍपल कंपनीशी संपर्क साधला असता या कंपनीने म्हटले आहे की, आम्ही भारतामध्ये सर्व उत्पादने घेण्यास अतिशय उत्साही आहोत. त्याचबरोबर आयफोनला भारतातूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या कंपनीची उत्पादने भारतातही मोठ्या प्रमाणात विकली जाण्याची शक्यता या कंपन्याला वाटते.
भारतात लवकरच 5 -जी सेवा सुरू होणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये स्मार्टफोन बाळगणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांबरोबरच आयफोन कंपनीला भारतीय बाजारपेठेचे आकर्षण वाटत आहे.
अशातच भारत सरकारने भारतामध्ये फोनचीची निर्मिती व्हावी याकरिता या क्षेत्रात उत्पादन आधारित योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर फोनसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी उत्पादन आधारित योजना सुरू केली आहे. त्यामुळे भारतामध्ये जगातील सर्व मोबाईल कंपन्या उत्पादन सुरू करीत आहेत. आयफोन यामध्ये सामील झाले असल्याचे दिसून येत आहे.