मुंबई -सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेज जाहीर करणार असल्याचे समजल्यानंतर शेअरबाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली होती. मात्र, पॅकेज जाहीर झाल्यानंतर विक्री झाल्यामुळे निर्देशांकांना उच्च पातळी कायम ठेवता आली नाही.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 84 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 40,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 16 अंकांनी वाढून 11,930 अंकांवर बंद झाला. अर्थमंत्री सीतारामन यांनी कर्मचाऱ्यांना काही सवलती दिल्यामुळे थोडी मदत होईल. दीर्घ पल्ल्यात अर्थव्यवस्थेला याचा लाभ होणार नाही, असे रेलिगेअर सिक्युरिटी विश्लेषक अर्जुन महाजन यांनी सांगितले. आज झालेल्या खरेदीचा फायदा माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, ग्राहक वस्तू,
क्षेत्रांना झाला.
खंडित वीजपुरवठ्यावेळी कामकाज सुरळीत
मुंबईमध्ये सकाळी बऱ्याच भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, या काळातही मुंबई आणि राष्ट्रीय शेअरबाजाराच्या कामकाजावर कसलाही परिणाम झाला नाही. सकाळपासून बाजार बंद होईपर्यंत सर्व काम सुरळीत होते, असे शेअरबाजारांनी सांगितले.