मागील महिन्यातील पीएमसी बॅंकेतील एचडीआयएल घोटाळ्यामुळं सर्वसामान्य लोकांना स्वतःचेच पैसे काढण्यावर लावलेले निर्बंध आणि अशा गुंतवणूकदारांचे बॅंकेकडं असलेल्या कोट्यवधी रुपयांचं काय होणार अथवा काय झालं हा प्रश्न अनुत्तरीत असताना अनेकांच्या जिव्हाळ्याची व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खास विश्वास संपादन केलेल्या सहकारी बॅंकेस रिझर्व्ह बॅंकेनं लावलेल्या कोटी रुपयांच्या पेनॉल्टीमुळं पुन्हा सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकविला.
यावर सध्या तरी बॅंकेच्या सीईओनी सारवासारव केली असली तरी प्रत्येक खातेदाराच्या व खासकरून बॅंकेतील गुंतवणूकदाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यावाचून राहणार नाही. अनेक गुंतवणूकदारांचा आत्तापर्यंत हा भ्रम होता की सर्वांत सुरक्षित गुंतवणूक म्हणजे बॅंकेतील एफडी ! परंतु, बॅंकेच्या मुदत ठेवीस देखील केवळ 1 लाखाचंच विमा कवच असतं हे आतापर्यंत सर्वांनाच कळून चुकलंय.
1993 मध्ये सुधारणा केल्या गेलेल्या या नियमात खरं तर आता पुन्हा योग्य सुधारणा करण्याची गरज आहे. कारण 1993 साली एसबीआय सारख्या सरकारी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेले 1 लाख पुनर्गुंतवीत गेल्यास त्याची आज 26 वर्षांनंतर किंमत ही कमीत कमी 12 लाख रुपये झालीय. मग आता त्यावरील सुरक्षा विमा 1 लाख असल्यास काय उपयोग ? बुद्धीवादी गुंतवणूकदार मागील कांही वर्षांत मुदतठेवी ऐवजी डेट म्युच्युअल फंडाकडं वळलेला होता परंतु मागील वर्षातील आयएल अँड एफएस व डीएचएफएल मधील समस्यांमुळं अनेकांना मॅच्युरिटीला देखील परतावे मिळालेले नाहीत.
तिसरा सुरक्षित मार्ग म्हणजे, सोन्यामधील गुंतवणूक. परंतु ही गुंतवणूक देखील सुरक्षित आहे का ? सोन्याचा दर हा देखील वर-खाली होतच असतो व तो दर देखील जागतिक घडामोडींवर अवलंबून असतो, म्हणजे जोखीम ही आहेच. त्यातून अशी केलेली गुंतवणूक केलेलं सोनं सांभाळायचं म्हणजे देखील जोखीम, त्यातच मागील आठवड्याच्या शेवटी, मोदी सरकार बेहिशेबी सोन्याबाबत माफी’ योजना आणण्याच्या विचारात आहे अशी वावडी उठल्यावर ह्या प्रकारात गुंतवणूक केलेले व करू इच्छिणारे देखील यापासून दूर राहणं पसंद करतील. ही व्यथा आहे सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुंतवणूक पर्यायांची.
तर मग प्रश्न असा पडतो की सर्वांत सुरक्षित गुंतवणूक कोणती ? नुसतं बॅंक खात्यात पैसे ठेवणं ? परंतु इथं देखील जोखीम (पीएमसी बॅंकेमुळं ऐन दिवाळीत लोकांचं दिवाळं काढलं). गुंतवणूक म्हटलं की जोखीम ही आलीच. आता सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मनात खरा प्रश्न उद्भवलाय की पैसे ठेवायचे कुठं ? गुंतवणूक करायची कुठं ? कारण जोखीम तर सर्वत्रच दिसत आहे. तर माझ्या मते, सर्वांत सुरक्षित गुंतवणूक अशी संज्ञाच गुंतवणूक शास्त्रात नाही. तर मग गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायात कमी अधिक जोखीम असेल तर योग्य प्रकारे जोखीम जोखून पैसे गुंतवण्यास काय हरकत आहे ? हिम्मत-ए-मर्दा तोह मदद-ए-खुदा..
माझं अगदी प्रामाणिक मत आहे की तुमच्या पुढील एक वर्षाच्या गरजा भागतील एवढी रक्कम नेहमी हाताशी ठेवा, ती कधीच जोखीम असलेल्या पर्यायात गुंतवू नका. जी रक्कम पुढील दोन-तीन वर्षानंतर लागणार आहे ती तुलनेनं कमी जोखीम असलेल्या पर्यायात गुंतवा व सर्वांत जास्त जोखीम म्हटल्या जाणाऱ्या प्रकारात म्हणजे शेअरबाजारात गुंतवणूक करताना कमीतकमी पुढील 5 ते 10 वर्षांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच गुंतवणूक करा व वेळोवेळी हाव न करता त्यातून आपला परतावा तपासून हाव न धरता नफा वसुली करत रहा आणि वेळ आल्यास, धोका जाणवल्यास मुद्दल काढून घ्यावयास देखील मागं-पुढं पाहू नका.
सध्याचा शेअरबाराचं (सेन्सेक्स) मूल्य हे त्याच्या पुस्तकी मूल्याच्या 2.94 पट आहे, जे 2018 साली 3.35 पट होतं, तर 2008 सालच्या तेजीमध्ये ते 5.47 पट होतं. आता, भारतीय बाजाराचं मार्केट कॅपिटलायझेशनचं भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाशी (जीडीपी) गुणोत्तर प्रमाण हे 78.5 % आहे जे 2007 सालच्या तेजीत 146 % होतं. तर सध्या निफ्टीचा पीई रेश्यो हा 27.47 असून 29.90 ह्या त्याच्या 3 जूनच्या उच्चांकापेक्षा कमीच आहे तर हाच 2008 मधील उच्चांक होता 28.29. अशा परिस्थितीत चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करा. जो व्यवसाय आपणांस समजतो त्यातच गुंतवणूक करा. उत्तम व्यवसायिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा.
अशा कंपन्यांकडं लक्ष ठेवा, की त्या कंपनीच्या प्रमुख उत्पादनास तोडीसतोड कोणतंच उत्पादन नसेल व जे उत्पादन पुढील 10-15 वर्षं तग धरून राहील (उदा. नेसकॅफे, मॅगी, फेविकॉल, खास पेटंट असलेली औषधं, इ.) ढोबळमानानं भारतीय कंपन्यांची मागील 7-8 वर्षातील उत्पन्नात नरमाईच होती आणि पुढील काही वर्षांत जरी उत्पन्नाची भरपाई जोरकस नसली तरीही आपण ठीकठाक उत्पन्नाच्या चक्राची अपेक्षा ठेऊ शकतो.
ज्यांत प्रामुख्यानं मोठा वाटा हा सरकारी व खाजगी मोठ्या बॅंकांचा असून, सिमेंट कंपन्या, हॉस्पिटल्स-हॉटेल्स, इन्शुरन्स कंपन्या, स्टील आदी क्षेत्रांना पुढील वर्षांत सुवर्ण दिवस येतील असं वाटतंय. त्याजबरोबरीनं पीएसयू कंपन्यांना देखील विसरून चालणार नाही. आता, कमी व्याजदर असतानाच योग्य पुरवठा साखळी व नवनवीन नोकऱ्या निर्माण करून मागणी बाजारात नवचैतन्य साधणं ही आज काळाची गरज ठरतीय.. पाहू काय होतंय ते..