बाजार पुन्हा काठावर
मागील आठवड्यात प्रमुख निर्देशांकांनी बाजारानं ‘जैसे थे’ परिस्थिती अनुभवली. सेन्सेक्सनं 2.72 अंशांची कमाई केली तर निफ्टीनं 18.95. मागील आठवड्यातील याच विषयावरील लेखात उल्लेखल्याप्रमाणं, बाजार गेल्या आठवड्यात देखील निफ्टी वर्तवलेल्या मर्यादेबाहेर गेला नाही असंच दिसून आलं. 12050 या पातळीवरील बंद भाव दिल्यास पुन्हा निफ्टीनं पर्यायानं निर्देशांकानं तेजी पकडलीय असं म्हणता येऊ शकतं असं म्हटलं होतं. परंतु मागील आठवड्यात 12038.60 हाच उच्चांक प्रस्थापिला गेला आणि तेजीची आशा धूसर झाली.
या आठवड्यासाठी सुद्धा 12050 हीच पातळी महत्वाची म्हणून गृहीत धरता येईल. तर खालील बाजूस 11800 व 11700 या पातळ्या आधारपातळ्या म्हणून विचारात घेता येऊ शकतात. तांत्रिक साप्ताहिक तक्त्यावर गेले तीन आठवडे निफ्टीनं ‘दोजी’ संरचना स्थापन केलेली दिसते, याचाच अर्थ कोणत्याही दिशेनं ठोसपणे कूच करण्यात आलेला अभाव. ही परिस्थिती पुन्हा काठावर राहण्याबरोबरीनं येणाऱ्या आठवड्यांत मोठ्या वध-घटीकडं अंगुलीनिर्देश करीत आहे.
क्रिकेटमधील जाणकारांना मॅच सुरु असताना एक प्रश्न नेहमीच विचारला जातो, तो म्हणजे ‘काय वाटतंय?’ जरी मॅचचा निकाल स्पष्ट असेल तरीही हा प्रश्न निश्चितच कानावर पडतो. अटीतटीच्या सामन्याच्या बाबतीत तर, प्रश्न विचारणाराच सर्व खेळाडूंच्या क्षमतेचा विचार करून, त्यांच्या प्रतिभेनुसार, खेळातील सद्य परिस्थिती व वातावरण यांचा साधारणपणे विचार करून आपलं मत देखील मांडून मोकळा होताना आढळतो. अगदी याचीच री ओढत, शेअरबाजारात देखील अशी उदाहरणं हमखास आढळतात.
‘मार्केट’ मधला माणूस भेटल्यावर त्याची ख्याली-खुशाली विचारल्यानंतर बोललं जाणारं विधान म्हणजे, सध्या बाजार जोरात आहे’ किंवा सध्या मार्केट डाऊन आहे, नाही !..’ आता हा प्रश्न मला विचारला गेल्यास एकंदरीतच बुचकळ्यात पडायला होतं की समोरची व्यक्तीही, नवीन गुंतवणूक करण्यासाठी असा प्रश्न विचारत आहे की, गुंतवणूकदारांना खिजवण्यासाठी! कारण बाजार चांगला / जोरात आहे असं उत्तर दिल्यास समोरची व्यक्ती म्हणते, सगळीकडं मंदी असताना बाजार कसा काय वरती धरून टिकवून ठेवलाय’ कोणास ठाऊक ! आणि याउलट जर बाजारातील तेजी शाश्वत नाही असं उत्तर द्यावं तर भिती की, आपलेच दात व आपलीच जीभ.
गंमतीचा भाग सोडल्यास, अनेक वेळा बाजारातील घडामोडी, देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक आणि कंपन्यांची परिस्थिती यांवरून बाजाराचं गणित लावता येऊ शकतं. तरीदेखील अनेकवेळा बाजारातील घडामोडी चक्रावून टाकणाऱ्या असतात. कारण बाजार हा नेहमीच संवेदनशील ठरत आलाय. आजच्या घडीलादेखील बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. भारतीय बाजारपेठेचे समृद्ध मूल्यांकन हे अर्थव्यवस्थेच्या नाजूक स्थितीशी विरोधाभासात्मक आहे आणि म्हणूनच वाढ दर्शवणारे शेअर्स आणि मोलाच्या कंपन्यांचे शेअर्स यांच्या किंमत-मूल्यात मोठी तफावत आहे.
शेअरबाजार आणि त्यातील दर्जेदार भाग, हा अर्थव्यवस्था आणि उत्पन्न यांमधील वाजवी पुनर्प्राप्ती मोठ्या प्रमाणात गृहीत धरत आहे कारण, कमी केलेला कॉर्पोरेट कर. तथापि, अर्थव्यवस्थेला सामोऱ्या येणाऱ्या रचनात्मक अडचणी लक्षात घेता, त्वरित पुनर्प्राप्तीची शक्यता धूसर दिसते.आजमितीस तरी, अर्थव्यवस्था खालच्या पातळीवर असल्याचं चित्र दिसतंय तर बाजार उच्च पातळीवर असल्याचं दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या 27.77 पट व्यवहार करीत आहे आणि आर्थिक पुनर्प्राप्ती आणि कंपन्यांच्या उत्पन्नातील सुधारणा गृहीत धरल्याचंच दिसून येत आहे.
मात्र, उपभोग अथवा वस्तू वापराच्या क्रियेस बळ देण्यासाठी किंवा गुंतवणुकीच्या मागणीसाठी देशाच्या वित्तीय आघाडीवर करावी लागणारी कसरत, नीचांकापासून उलटी फिरलेली महागाई त्यामुळं धूसर वाटणारी व्याजदरकपात, उच्च पातळीवरील सरकारी कर्जं, अशा अनेक संरचनात्मक मुद्द्यांमुळं आर्थिक पुनर्प्राप्ती नजीकच्या काळात आव्हानात्मक वाटत आहे. सध्याच्या अनिश्चिततेतील बाजारात बॉंडमधील परतावा आकर्षक वाटू लागल्यानं व पर्यायानं बॉंडसाठी मागणी वाढू लागल्यानं त्यातील (परताव्याचं उत्पन्न) यील्ड कमी होतं व त्यामुळं परतावा कमी मिळत असल्यानं लोक ते पैसे न गुंतवता खरेदीसाठी वापरतात. (बॉंडचे उत्पन्न महागाई, आर्थिक वाढ, कर्जचुकवेगिरीची संभाव्यता व कालावधी इ. गोष्टींवर आधारित असतं.
बॉंडवर व्याजापोटीनिश्चित रक्कम मिळते जी इतर अटी विचारात न घेता दिली जाते, यामुळं असे रोखे गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करतात, म्हणून बॉंडच्या किंमती वाढतात. बॉंडच्या वाढीवकिंमती म्हणजे कमी उत्पन्न/परतावा.) अशाप्रकारे कमी बॉंडउत्पन्न उपभोग क्षेत्रातील समभागांचं समृद्ध मूल्यांकन करणं चालूच ठेऊ शकतात. तथापि मागणीअभावी, वाहन आणि बांधकाम साहित्य यांसारख्या कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यांकनाबाबतीत पुनर्रमूल्यांकन होऊ शकते. जरी आघाडीच्या खाजगी बॅंकांच्या शेअर्सच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकावर व्यवहार करत असतील तरी, नुकतेच जाहीर झालेले टेलिकॉम कंपन्यांच्या कर्जाचे अवाढव्य आकडे सध्याच्या बॅंकांच्या समभागांच्या मूल्याबाबत साशंकता उत्पन्न करतात.
तसेच, कांही सरकारी कंपन्यांचं (पीएसयू) खाजगीकरण यासारख्या गोष्टी त्या क्षेत्राच्या विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे काही मौल्यवान कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबतीत भर घालू शकतात.याउलट, वृद्धी दर्शवणाऱ्या समभागांसाठी (ग्रोथ स्टॉक्स) गुंतवणूकदारांनी समृद्ध मूल्यांकनाबाबत चिंता करणं ही ताणलेली अपेक्षा ठरू शकेल.
सध्यातरी, भारतीय अर्थव्यवस्था-भारतीय भांडवली बाजार यांदरम्यानच्या व वृद्धी-मूल्य यांच्या समभागातील मूल्यांकनं यांच्यामध्ये दिसणाऱ्या या विभिन्न द्वंद्वाभावाबरोबर कांही काळ आपल्याला काढावा लागेल असंच दिसतंय.
एखाद्या कंपनीबाबत किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेबाबत बाजाराचे आडाखे नेहमीच दोन पावलं पुढं असतात, गरज आहे ती आपण त्यातून शिकण्याची व आपला फायदा करून घ्यायची (नुकसानीमध्ये देखील). कारण बाजारानं भल्याभल्यांना पाणी पाजलेलं ऐकलंय, पाहिलंय, त्यामुळं बाजारास सुप्रीम म्हणत त्याप्रमाणं आपल्या गुंतवणूकपद्धतीत बदल केल्यास नक्कीच अशा गोष्टी जमेच्या ठरू शकतात.
– प्रसाद भावे