मुंबई – देशात 2010-14 मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीच्या तुलनेत 2015-19 मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीत दुपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नव्या गुंतवणुकीसाठी देशात आलेल्या मोठ्या 253 नव्या प्रकल्पांपैकी 218 प्रकल्प हे खासगी मालकीचे आहेत.
एका अहवालानुसार, 2015-19 या पाच आर्थिक वर्षांत देशात एकूण 47 हजार 911 नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले. त्या माध्यमातून देशात 60 लाख 51 हजार 281 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली आहे. याआधी 2010-14 या पाच वर्षांत 29 लाख 28 हजार 125 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 43 हजार 876 नव्या प्रकल्पांची घोषणा झाली होती. त्यामुळे आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत 2015-19 मध्ये लहान-मोठ्या अशा एकूण 4 हजार 035 प्रकल्पांनी वाढ झाली आहे.
उत्पादन, खाणकाम, पायाभूत सुविधा, सिंचन या क्षेत्रांमधील गुंतवणुकीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असली, तरी विद्युत क्षेत्रातील गुंतवणुकीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे. 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत उत्पादन व सिंचन क्षेत्रांमध्ये नव्या प्रकल्पांची घोषणा होण्याची संख्या तुलनेने कमी होती. यामध्ये 1 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेल्या उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये 7 लाख 725 कोटींवरून 16 लाख 15 हजार 456 कोटी रुपयांर्पर्यंत गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे पाच वर्षांत झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 26.7 टक्के वाटा उत्पादन क्षेत्राने उचलला आहे. याशिवाय खत, स्टील, सिमेंट, रिफायनरी व इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमधील गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे.