मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा फेरा लागला आहे. मात्र आता देशमुखांनी ईडीविरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपास यंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे.
मुंबई न्यायालयाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे. अनिल देशमुखांच्या वतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत असून ईडीची बाजू अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह अशी वकिलांची तगडी फौज युक्तिवाद करत आहे.
#BombayHighCourt is hearing the plea by #AnilDeshmukh seeking quashing of ED summons issued in money laundering case.@AnilDeshmukhNCP @dir_ed pic.twitter.com/62rX4Ia1gz
— Bar & Bench – Live Threads (@lawbarandbench) September 9, 2021
अनिल देशमुखांना तातडीच्या दिलाशाची गरज असल्याचे देशमुखांच्या बाजूने सांगण्यात आलं असून तपासयंत्रणा चौकशीची गरज कशासाठी?, याची माहिती देत नाहीये, तपास यंत्रणेने अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही. या प्रकरणानं तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, असा आरोपही देशमुखांच्या पक्षाने केला आहे. तर अनिल देशमुखांच्या याचिकेच्या वैधतेवरच सरकारी पक्षाचा आक्षेप आहे. अश्याप्रकारे ही याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी. हे निवडण्याचा अधिकार फिर्यादीचा असू शकत नाही, अशी माहिती सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.
दरम्यान प्रकरण प्रलंबित असताना, ते अवाजवी खळबळ निर्माण करत आहेत, नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि निवडक कागदपत्रं आणि माहिती लीक करत आहेत असा आरोप अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. न्यायालयाने आपला निकाल सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.