नवी दिल्ली – मोबाइल फोनमधील अँड्रॉइडच्या अनुषंगाने गुगल कंपनी स्पर्धेविरोधी काम करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, याची शहानिशा स्पर्धा आयोग करणार असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याच अनुषंगाने युरोपियन आयोगाने गुगल विरोधात निर्णय दिला होता. तशाच प्रकारच्या तक्रारी भारतातूनही आल्या आहेत. भारतातील बहुतांशी मोबाइल फोनवर अँड्रॉइड ही पद्धत वापरली जाते. पुरावा उपलब्ध झाल्यानंतरच स्पर्धा आयोग चौकशी करीत असतो. अँड्रॉइडमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना फोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करता येऊ लागला आहे. त्याचबरोबर या सेवेचे दरही तुलनेने कमी आहेत. यासंदर्भात झालेल्या तक्रारी स्पर्धेच्या चौकटीत बसतात का, याचा विचार केला जाणार आहे. मात्र, या तक्रारीत फारसे तथ्य नसल्याचे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले.
युरोपियन आयोगाने दिलेल्या निर्णयाला गुगल कंपनीने आव्हान दिलेले आहे. भारतात स्पर्धा आयोगाने गेल्या वर्षी ऑनलाइन सर्चबाबतच्या अयोग्य पद्धतीमुळे गुगलला दंड केला होता. या निर्णयाला गुगलने न्यायालयात आव्हान दिले आहे.