नगर – कोपरगावच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने संबंधीत तक्रार केलेल्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांचीच चौकशी सुरु केली आहे.यामुळे गुरुजींमध्ये संभ्रम व भितीचे वातावरण असून हा चौकशीचा घाट कशासाठी असा सवाल शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. त्यात या प्रकरणातील मुख्याध्यापक सुभाष सोनवणे यांना निलंबित केल्याने या संघटनांनी नाराजी व्यक्त करत याविषयावर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी चालवली आहे.
कोपरगाव तालुक्यात दोन प्राथमिक शिक्षकांनी दोन महिन्यात प्रशासनाच्या दबावाखाली आत्महत्या करण्याचा आरोप करत शिक्षक संघटना आक्रमक बनल्या होत्या. दैनिक प्रभातने सतत याविषयावर प्रकाशझोत टाकल्याने त्याची प्रशासकीय पातळीवर दखल घेत शेख यांचा पदभार काढून घेतला होता. यावरून प्रशासन,राजकीय पदाधिकारी व शिक्षक संघटना यांच्यात चांगलीच ताणाताणी सुरु झाली होती.
त्यानंतर शेख यांचा पदभार काढून घेण्यात आला.मात्र संघटना निलंबन किंवा बदलीची मागणी करत होते. गेली दोन महिने विधानसभा निवडणुका व दिवाळी सुट्टी नंतर आता या प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर या प्रकरणात ज्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी व शिक्षकांनी कारवाईची मागणी केली त्यांनाच आता चौकशीला बोलविल्याने सदर शिक्षक आवाक झाले आहेत.
कालपासून चौकशी सुरु झाल्या असून भरमसाठ प्रश्नांचा यात मारा करण्यात आलेला आहे.काल कोपरगाव पंचायत समितीत काही शिक्षक नेत्यांची तर आज नगर येथे जिल्हा परिषदेत काही शिक्षक नेत्यांना चौकशीसाठी बोलविले होते. शेख यांची बदली वा निलंबन तर केले नाहीच उलट या प्रकरणातील मुख्याध्यापक सोनवणे यांना निलंबींत करण्यात आले आहे. सोनवणे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आक्रमक झाल्या असून ही कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
मुख्याध्यापकासह केंद्रप्रमुख निलंबित
शालेय गैरवर्तनाबरोबर आर्थिक अनियमितता आणि अन्य कारणांवरून टाकळी (ता. कोपरगाव) येथील शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोंडाजी सोनवणे व बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथील केंद्रप्रमुख कांता गणपत घावटे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
घावटे यांच्यावर आर्थिक अनियमितता व शालेय गैरवर्तनाचा ठपका आहे. त्याबाबत राहुरीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात घावटे यांनी नियमभंग केल्याचे स्पष्ट केल्याने, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. घावटे यांना निलंबनाच्या कालावधीत शेवगाव पंचायत समिती मुख्यालयात, तसेच सोनवणे यांना श्रीगोंदे मुख्यालयात काम देण्यात आले आहे. दोघांनाही गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.