प्रशांत जाधव
महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट; दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाणही घटले?
सातारा – राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले असताना त्यात दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांचा समावेश असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, आता पुणे- बंगळुरू महामार्ग याला अपवाद ठरला आहे. महामार्ग पोलिसांच्या भुईंज विभागाच्या कर्मचाऱ्यांना 2019 या वर्षात फक्त दोघेच दारू पिऊन गाडी चालवणारे सापडल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता महामार्गावर दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकाही वाहनावर कारवाई केली नसल्याने महामार्गावरून अशी वाहतूक होत नसल्याचा जावईशोधच महामार्ग पोलिसांनी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखेच्या भुईंज टॅपच्यावतीने खंडाळा ते शेंद्रे या भागात बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षात वाहतूक शाखेच्या भुईंज टॅपच्यावतीने 19 हजार 152 वाहनधारकांडून 73 लाख वीस हजारांचा दंडात्मक महसूल जमा करण्यात आला आहे.
मात्र, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या केवळ दोघांवरच कारवाई झाली असल्याने हे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होत आहे. हे परम कर्तव्य बजावत असताना महामार्ग पोलिसांना 2019 या अखंड वर्षात खंडाळा जुना टोलनाका ते शेंद्रेदरम्यान त्यांच्या हद्दीत केवळ एक प्रवासी वाहतूक करणारे वाहन सापडले आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीचे प्रमाण खरचं कमी झाले की, महामार्ग पोलिसांच्या डोळ्यावरील पट्टीमुळे त्यांना दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहवी, यासाठी हायवे पोलीस काम करत आहेत. यापूर्वीही त्यांच्याकडून कारवाया करून दंड गोळा केला जात होता. मात्र, नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक स्पिड गनमुळे दंडाचा आकडा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. 2019 या वर्षात वाहतुक शाखेच्या भुईंज टॅपच्यावतीने भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या एक हजार 469, महामार्गावर लेन कटिंग करणाऱ्या तीन हजार 660, बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या 80, रिप्लेक्टर न लावलेल्या 104, फॅन्सी नंबरप्लेट 11, सिटबेल्ट न लावल्याने चार हजार 645, अवैध प्रवासी वाहतूक एक, नो पार्कींग झोनमध्ये वाहने लावणाऱ्या 41, “नो एन्ट्री’मधून वाहने चालवणाऱ्या 52, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 93 तसेच इतर छोट्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या एकूण 19 हजार 152 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून तब्बल 73 लाख 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असे असले तरी महामार्गावर अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेला आकडा पाहिल्यानंतर अनेक शंका उपस्थित होत आहेत.
खंबाटकी घाटातील तोडी थांबणार का?
महामार्ग पोलिसांच्याकडे अनेक हौसे नवसे कर्तव्याला आहेत. त्यातील तर अनेकांनी तर वर्षानुवर्षे त्याचठिकाणी ठाण मांडले आहे. त्यामुळे कोणाला कोठे अडवायचे, कोणाकडून काय घ्यायचे याचा अंदाज आहे. परिणामी काही बहाद्दर खंबाटकीच्या घाटातच ट्रक चालकांना खासकरून परराज्यातील चालकांना शिकार करत असल्याची चर्चा आहे.
म्हणे ओव्हरलोड नाहीच!
पुणे बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. राज्यातील व परराज्यातील ट्रक या महामार्गावरून बंगळुरू- मुंबई असे धावत असतात. यादरम्यान अनेक मोठ्या ट्रकमधून नियमापेक्षा जास्त माल भरलेला दिसतो. टोलनाक्यावर तर अनकेदा ओव्हरलोडमुळे टोल घेण्यावरून व देण्यावरून वाद झाले आहेत. असे असताना महामार्ग पोलिसांना 2019 या वर्षात एकही ओव्हरलोड असलेले वाहन न सापडल्याने लोकांच्या सर्व काही लक्षात येत आहे.