अवैध उत्खनन; बेसुमार वृक्षतोड
आठ गावांना भूस्खलनाचा धोका; स्थानिक प्रशासन जागं कधी होणार?
“माळीण’ दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची मावळात “छाया’
कामशेत – नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, पाले (नाणे मावळ), मोरमारेवाडी, जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड आदी गावे अगदीच डोंगराच्या पायथ्याला वसलेली आहे. त्यातच बेसुमार वृक्षतोड, अवैध उत्खनन तसेच ओढ्यांचे बदललेले प्रवाह आदी गोष्टींमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर माळीणसारखी दुर्घटना होऊ शकते.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेत डोंगरांच्या कुशीत अनेक छोट्या मोठ्या वस्त्या व गावे वसली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात अनेक वर्षे ही गुण्यागोविंदाने नांदतात. या गावांना भूस्खलनाची नजर लागत आहे. बेसुमार वृक्षतोड, मोठ्या प्रमाणावर होणारी मुरूम व मातीची चोरी यामुळे सह्याद्रीचा समतोल ढासळत आहे.
धनदांडग्यांनी सह्याद्रीला पोखरून टोलेजंग बंगले बांधले आहेत. यासाठी येथील वर्षानुवर्षे वाहणारे पाण्याचे प्रवाह फिरवले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात आहेच, शिवाय पायथ्याला असलेल्या शेतीलाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
या गावांवर भूस्खलनाची धोक्याची टांगती तलवार आहे. मागे काही वर्षांपूर्वी नेसावे गावावरील डोंगराला सुमारे दोन फूट रुंद लांबलचक खोल चर पडून हा भाग मुख्य डोंगरपासून वेगळा झाला आहे. तसेच पाले (नाणे मावळ) येथे दोन वर्षांपूर्वी वीज पडून चीर पडली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने ग्रामसभा घेवून पुनर्वसना संबधीत चर्चा झाली. पण प्रत्यक्षात एखादी दुर्दैवी घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न ग्रामस्थ, स्थानिक रहिवाशांना पडला आहे.
मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले संपादन, बेसुमार झालेली वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास… वेगवेगळ्या कारणांमुळे नैसर्गिक प्रवाह बदलले आहे. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावांमध्ये हे बदल दिसत आहेत.
डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील या गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात एखादी “माळीण’ या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास प्रशासन यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल, असेही बोलले जात आहे.
वेळीच सावधानता गरजेची…
मावळ तालुक्यातील भाजे गावात डोंगराची दरड कोसळून जुलै 1989 रोजी पहाटे गाव झोपेत असताना गाडले गेले. या दुर्घटनेत सुमारे 49 लोकांना जीव गमवावा लागला होता. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावी जुलै 2014 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या दरडी खाली गाडले गेले. त्यात सुमारे 150 नागरिकांचा बळी गेला. या घटनांमुळे प्रशासन धडा घेणार का याबाबत बोलले जात आहे.
डोंगराच्या कुशीतील बोरज, कळकराई, तुंग, मालेवाडी, ताजे, लोहगड, भुशी, माऊ या आठ गावातील लोकांना नैसर्गिक आपत्तीच्य काळात सुरक्षित राहणे बाबत प्रशिक्षण दिले आहे. या धोकादायक गावात उत्खनन करण्यास बंदी करण्यात आली आहे. उत्खन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आहे.
– रावसाहेब चाटे, नायब तहसीलदार, मावळ