मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे पक्षातील बंड आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यातून त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडले आहे. या मुलाखतीचा टीझर काल राऊत यांनी शेअर केल्यानंतर या टीझरवरुनच निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विटरवरुन भाष्य केले आहे. मागील वर्षी उद्धव यांनी अशाच प्रकारे दिलेल्या मुलाखतीमधील फोटो आणि आजच्या मुलाखतीमधील फोटो एकत्र शेअर करत निलेश यांनी दोन्ही फोटोंची तुलना केली आहे. ‘इथे पण फरक’ असे म्हणत निलेश यांनी मागच्या वर्षीच्या फोटोवर ‘सत्ता होती तेव्हाची मुलाखत’ तर यंदाच्या फोटोवर ‘सत्ता गेल्यानंतरची मुलाखत’ असा मजकूर लिहिलेला आहे. या फोटोला देण्यात आलेले कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
मागील वर्षीची मुलाखत घेताना सकाळच्या वेळेची निवड करण्यात आलेली तर यंदाची मुलाखत ही बंद खोलीत घेतल्याचे दिसत असून यावरुनच निलेश राणेंनी, “उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात,” असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रकाशित होणार असून आज पहिला भाग प्रकाशित झाला आहे तर उद्या म्हणजेच २७ जुलै रोजी दुसरा भाग प्रकाशित होणार आहे.