कराड – मोदींनी आत्तापर्यंत अनेक कंपन्या गुजरातला पळवल्या आहेत. तसेच विविध बॅंकांची मुख्यालयेही गुजरातलाच नेली आहेत. आता तर त्यांनी महाराष्ट्रासह मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांत व फॉक्सकॉन या कंपनीवर दबाव आणून कंपनीचा प्रकल्पही गुजरातला पळवला आहे, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यासाठी तात्पुरती ऍरेंजमेण्ट केलेल्या सरकारचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेसलाच प्रयत्न करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, कॉंग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, “”देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पावर चर्चा झाली होती. सरकारने तळेगाव येथे हा प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सध्या महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल व संबंधित कंपनीवर हुकूमशाही पद्धतीने दबाव आणला जात आहे. यात मोदींनी हस्तक्षेप केला असून त्यांच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्रातील त्यांचे नेते सर्व काही करत आहेत.'” मात्र, या सगळ्याची तात्पुरती ऍरेंजमेण्ट करून स्थापन झालेल्या सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, “कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार नसून मी कॉंग्रेसच्याच विचारधारेचा आहे. मात्र, कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा, अशी मागणी मी केली होती. ती पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनीही मान्य केली असून त्यानुसार निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीत नेमलेली नकोत तर निवडून आलेली माणसे असावीत. यामागे कॉंग्रेस पक्ष मजबुतीने आणि लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे, ही भूमिका आहे.’
पालिका कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी
कराड येथे भूयारी गटार साफ करताना नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे बजावले आहे. घटनेतील मृत कर्मचाऱ्याला शासकीय मदत मिळेलच. तसेच त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यालाही नगरपालिकेत नोकरी मिळेल. परंतु, पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.