मुंबई – सध्या आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका लागला आहे. टेरर फंडिंगवर देखरेख करणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला करड्या यादीत टाकले आहे. यावर आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. गरिबी आणि अन्न यापेक्षाही अणुबॉम्ब आणि शस्त्रांस्त्रावर अधिक खर्च केल्यामुळे पाकिस्तानवर आज ही इंटरनॅशनल बेइज्जती ओढवली आहे, अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेने अग्रलेखात म्हंटले कि, उद्योगधंदे सुरु करण्याऐवजी दहशतवादाचे कारखाने सुरु करून पाकिस्तानने स्वतःचे वाटोळे करून घेतले. रक्ताला चटावलेले पाकिस्तानी हात आता भिकेसाठी पुढे होत आहेत. जगाने पाकडयांना खरच दया दाखवावी का? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.
एफएटीएफने करड्या यादीत टाकल्याने पाकिस्तानसाठी आर्थिक मदतीचे दरवाजे बंद झाले आहेत. आणि अर्थव्यवस्थ्येची बिकट परिस्थिती असताना जागतिक पातळीवरही प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानची नाचक्कीच होत आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या लष्करालाही आता इंटरनॅशनल बेइज्जतीची सवय झाली आहे. देश कुठलाही असो पण त्या देशातील शासक मंडळी जागतिक दरबारात कायमच भिकेचा कटोरा घेऊन उभे राहत असतील तर हे कुठल्या जनतेला आवडेल? पाकिस्तानची जनता वर्षानुवर्षे खालच्या मानाने हीच कुचंबणा सहन करत आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.