पुणे – विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार ते सांगणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “गुगली’ टाकली आहे. तर आता पुरंदर येथील मंजूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हलून पुन्हा खेडमध्ये होणार का? या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची आवश्यकता लक्षात घेऊन खेड-चाकण-राजगुरूनगर येथे जागा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. तीनवेळा जागा निश्चित करूनही येथे विमानतळ होऊ शकले नाही. खेड-चाकण परिसरातील विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जागा या प्रतिकूल दिशा, उंच डोंगरी पर्वत रांगांबरोबरच पर्यावरणाच्या निकषात बसत नसल्यामुळे नाकारण्यात आल्या होत्या. त्यामुळेच शेवटी पर्यायी जागांचा शोध घेऊन पुरंदर येथील जागा निवडण्यात आल्याचा स्पष्ट अहवाल भारतीय विमान प्राधिकरणाने (एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया) दिला होता.
या अहवालामुळेच चाकणचे विमानतळ पुरंदरला स्थलांतरित करण्यात आल्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानंतर तिथेही जोरदार विरोध होत असल्याने तिथेही काम रेटले जाईना केवळ कागदी घोडेच नाचवले जात आहेत, त्यामुळे नेमके विमानतळ पुरंदरमध्ये होणार की नाही याबाबतही संभ्रम कायम आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 500 कोटींची तरतूद विमानतळासाठी करणार असल्याचे जाहीर केले; मात्र स्थळ गुलदस्त्यात ठेवल्याने विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात येणार का? अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
महाविकास आघाडीमुळे कोणाला फटका बसणार?
सध्या राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यातच शिरूर लोकसभा व खेड विधानसभा मतदारसंघात कायमच शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये “काटे की टक्कर’ रंगते. मात्र, आता हे दोघेही एकाच छताखाली सत्तेत असल्याने आगामी 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उभे राहणार का? आणि तसे झाले तर शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा तर विधानसभा मतदारसंघात दिलीप मोहिते पाटील यांनी सुरेश गोरे यांचा पराभव केला. महाविकास आघाडीमुळे शिवसैनिकांना येथे राष्ट्रवादीच्या विरोधात जाण्याचीही “गोची’ झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार सुवर्णमध्य काढतील का? आणि जर काढला तर लोकसभा की विधानसभा शिवसेनाला सोडणार हे पाहावे लागेल.