सुनील जगताप : उरूळीत 21 पासून कृषी वैभव प्रदर्शन
सोरतापवाडी – तरुण- तरुणींना कृषी क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, तसेच शेती व्यवसायात नवनवीन आधुनिक पद्धतीचा अवलंब होऊन या क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हावा तसेच दुग्ध व्यवसाय व इतर शेतीपूरक क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपक्रम राबविले पाहिजे, असे मत हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप यांनी व्यक्त केले. धवलक्रांतीचे जनक डॉ. मणिभाई देसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित कृषी वैभव राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन दि. 21 ते दि. 24 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. प्रदर्शनाच्या सभामंडपाचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, उपाध्यक्ष सुनील गोते, सचिव रोहिदास कोतवाल, कार्याध्यक्ष संतोष कांचन, सह कार्याध्यक्ष सागर कांचन, खजिनदार सोमनाथ कोतवाल, ज्येष्ठ विश्वस्त संजय टिळेकर, संजय कांचन, सुभाष कड, आण्णासाहेब कोतवाल, हरिदास गोते, संतोष दौंडकर, गोविंद तापकीर, पोपट साठे, अमोल भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन म्हणाले की, प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दि. 21 रोजी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात कृषिसह सर्व समावेशक दालनांचा समावेश होणार आहे.
राज्यभरातील नामवंत पशु, पक्षी असणार आहेत. यावर्षीचे वैशिष्ट्ये म्हणजे डॉग शो व घोडा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे दालन असणार आहेत. यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पुणे जिल्हा बॅंक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, उरुळी कांचन ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी चार दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुनील गोते यांनी केले. सुभाष कड यांनी आभार मानले.