मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणांमध्ये आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे रेपोदरात पुन्हा 0.25% ची वाढ केली आहे. मात्र या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने 0.50% ची वाढ केली होती. त्या तुलनेत ही व्याजदर वाढ माफक समजली जात आहे. व्याजदरात वाढ केल्यानंतर त्या प्रमाणात व्यावसायिक बॅंका घर, वाहन इत्यादी संदर्भातील कर्जावरील व्याजदरात वाढ करीत असतात. ठेवीवरील व्याजदरातही वाढ होत असते. आज रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे रेपो दर 6.50% इतक्या उच्च पातळीवर गेला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने महागाई सहा टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केला आहे. ही महागाई आता सहा टक्क्याच्या जवळपास आली आहे.
तरीही आगामी काळात महागाई वाढू नये याकरिता रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, महागाई काही प्रमाणात कमी झाली असली तरी ती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. महागाई वाढल्यानंतर त्याचा सर्वसामान्य लोकांवर जास्त परिणाम होतो. यासाठी रिझर्व्ह बॅंक महागाई मर्यादेच्या आत ठेवण्यास प्राधान्यक्रम देत असते.
जागतिक परिस्थिती नकारात्मक आहे. त्याचा भारताच्या व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागणार आहे. सध्या कर्जपुरवठा दहा टक्के पेक्षा जास्त दराने वाढत आहे. अशा परिस्थितीत व्याजदरात कपात केल्यानंतर कर्ज पुरवठा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढून त्याचा महागाईवर परिणाम होऊ शकतो.
चालू खात्यावरील तूट रिझर्व्ह बॅंकेच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात चालू खात्यावरील तुट 3.3 टक्के आहे. मात्र आगामी काळात ही तूट आणखी कमी होण्याची शक्यता आहे. भारताकडे परकीय चलन साठा भरपूर असल्यामुळे भारताला या आघाडीवर फार चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.