नवी दिल्ली – महागाई कमी करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात बरीच वाढ केली आहे. मात्र कार विक्रीवर याचा अद्याप तरी परिणाम झाला नसल्याचा दावा मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
या कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, सेमीकंडक्टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा या उद्योगासमोर प्रश्न आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे उत्पादन अजून पूर्ववत झालेले नाही. व्याजदर वाढीचा ग्राहकाच्या मानसिकतेवर आतापर्यंत तरी परिणाम झालेला नाही. मे महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेने तीन वेळा व्याज दरात वाढ केली आहे. आगामी काळातही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
श्रीवास्तव म्हणाले की, मुळातच ग्राहकाकडून मागणी जास्त असूनही कार कंपन्यांचे उत्पादन अपेक्षेइतके नाही. त्यामुळे ग्राहकाच्या क्रयशक्तीवर परिणाम झालेला आहे की नाही याचा अंदाज येणे अवघड आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये कंपनीने क्षमतेच्या केवळ 40% कार तयार केल्या होत्या. आता ही परिस्थिती सुधारून 95% इतकी झाली आहे. हे उत्पादन 100 टक्के कधी होईल हे सांगता येणार नाही असे ते म्हणाले. या कंपनीची वर्षाला 22 लाख 50 हजार कार तयार करण्याची क्षमता आहे. आगामी काळामध्ये भारतात कार विक्रीला वेग येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.