नवी दिल्ली: अल्प बचतींवरील व्याजामध्ये कपात करणे हृदयशून्य आनि निर्लज्जपणाची कृती असून ही कपात त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे लोकांना आधीच त्रास सहन करावा लागत आहे. अशा कालावधीत अल्प बचतीच्या व्याजदरामधील कपात तर्कविहीन, अतार्किक आणि दुर्दैवी आहे. अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे गांजलेल्या शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसेल, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभरात 21 दिवासांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येत असल्यामुळे आगामी तीन महिन्यांसाठी (मार्चपासून जूनपर्यंत) सरकारने इएमआयवरील व्याज माफ करावे. कारण इएमआयला स्थगिती देणे म्हणजे मूर्खपणा आणि चालढकाल आहे, असेही शेरगिल यांनी म्हटले आहे.
करोनाच्या साथीमुळे आर्थिक दुर्बल घटकातील गरिब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच लघु आणि मध्यम उद्योजकांना मदत करण्यासाठी आर्थिक मदतीचे दुसरे पॅकेज द्यावे, अशी मागणीही शेरगिल यांनी केली आहे. अल्पबचतींवरील व्याजात कपात केल्यामुळे सरकारला 26 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. पण देशातील 90 टक्के जनतेचे उत्पन्न हिरावून घेतले जाईल. सरकारने नागरिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ते कमी करू नये, असेही ते म्हणाले.