अन्य शहरांत जावे लागणाऱ्या नोकरदारांची गैरसोय टाळण्याची मागणी
पुणे – केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेकडून मुंबईमध्ये लोकल सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून आता इंटरसिटी, लोकल आणि डेमू सुरू करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून सोमवारपासून मुंबईमध्ये उपनगरीय गाड्या धावण्यास सुरुवात झाली. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांनाच प्रवास करता येणार आहे. या गाड्यांमध्ये अन्य नागरिकांना प्रवासासाठी मनाई केली आहे. याचप्रमाणे प्रवाशांना पुण्याहून अन्य शहरांना जोडणाऱ्या आणि पुण्यापर्यंत येणाऱ्या प्रमुख मार्गांवरील गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुण्यामध्ये अनेक गावांतून कर्मचारी रेल्वेने प्रवास करतात, खासगी वाहनाने प्रवास करणे अनेकांना शक्य नाही, शहरांतील स्थानिक वाहतूक सुरू झाली नाही आदी कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामध्ये विशेषत: नोकरदारांचा समावेश आहे. यासह दररोज पुणे-मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांची गैरसोय आहे.
लोणावळा-पुणे-दौंड, लोणावळा-पुणे-नगर, लोणावळा-पुणे-सातारा या मार्गांवर 24 कोचची डेमू सोडण्यात यावी. याशिवाय कोल्हापूर, नाशिक, मुंबई आणि सोलापूर या शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी सुरू करावी. यामुळे हजारो प्रवाशांची व्यवस्था होणार आहे.
शारीरिक अंतर नियमाचे निर्बंध घालून नागरिकांना प्रवासाची परवानगी द्यावी, असे प्रवासी संघाकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये लोकल सुरू केल्या, हे चांगले आहे. याप्रमाणे पुण्यातदेखील लवकरात लवकर सेवा सुरू करण्यात यावी.
लॉकडाऊन शिथिल होत असल्याने, व्यवसाय सुरू झाले आहेत. सरकारी निमसरकारी आणि खासगी नोकरदारांना परवानगी प्रवासाची मुभा द्यावी. रेल्वेने ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेने 30 तारखेपर्यंत गाड्या धावणार नसल्याचे सांगितले होते. पण लवकर गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे इंटरसिटीदेखील सुरू करावी.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ