नगर – मागील तीन महिन्यापासून सर्वजण कोविड-19 सारख्या वैश्विक महामारीला तोंड देत आहोत. दिवसेंदिवस वाढणारे हे प्रमाण रोखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सहभाग महत्त्वाचा आहे. डॉ. बापूसाहेब कांडेकर व टीम करत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांनी सामाजिक भान ठेवून शासन योजनांच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे.
राज्यात व देशात आरोग्य सेवेतील कामाच्या माध्यमातून नोबल फाउंडेशनचे नाव अग्रगण्य होईल, अशी आशा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. नोबल मेडिकल फाउंडेशन, जिल्हा शासकीय रुग्णालय व डीपीडीसी, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नोबल इन्टेन्सिव्ह केअर युनिटचे उद्घाटन टोपे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.
यावेळी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आयुक्त श्रीकांत मायकलवार, नोबल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर, डॉ. पांडुरंग ढोले, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. सुंदर गोरे, डॉ. विजय पाटील, डॉ. दिलीप पवार, विजय निकम, राहुल हिरे यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी टोपे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात काम करावे तेवढे कमीच आहे. उभारण्यात आलेल्या या आयसीयूच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे हित जपण्याचे काम होईल. राज्यात एक चांगला थीम टॅंक बनवणार आहे. त्यासाठी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. करोनासारख्या महामारीने सर्वजण त्रस्त आहेत. त्याचा वेग वाढू नये, यासाठी ऍग्रेसिव्ह टेस्टिंग ट्रिटमेंटवर भर द्यावा.
ट्रेंड थोपवायचा असेल, तर होम क्वारंटाईनऐवजी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनवर भर द्यावा. तेथे चांगली स्वच्छता टापटीप ठेवावी. रुग्णांना चांगले भोजन द्यावे. नोबल हॉस्पिटल व फाउंडेशनला सहकार्य करू. करोनावर आपण लवकरात लवकर मात करू, असे ते म्हणाले.
पालकमंत्रीम्हणाले की, नोबल हॉस्पिटल व फाउंडेशनच्या माध्यमातून उभारलेल्या आयसीयू सेंटरचे काम कौतुकास्पद आहे. त्याचा लाभ सर्वसामान्म जनतेला होईल. कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता अशा नाजूक परिस्थितीत नोबल व जिल्हा रुग्णालयाने उभारलेल्या या आयसीयू सेंटरचा सर्वसामान्य रुग्णांना उपयोग होईल. सरकारी यंत्रणा व डॉक्टरांच्या सहकार्यामुळे नगर जिल्ह्यात कोविड आटोक्यात आहे.
खा. विखे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात असा आयसीयु वार्ड कुठेही नाही. प्रशासन व डॉक्टरांच्या सहकार्याने चांगले काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाला रोखण्यात आपण यशस्वी आहोत. करोनात काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करावे. ते आपल्यासाठीच काम करीत आहेत, याची जाणीव ठेवा. त्यांना त्रास देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.
सरकारी यंत्रणेवर आलेला ताण पाहता खासदार निधीतून लवकरच कोविड-19 साठी 12 ऍम्ब्युलन्स देणार आहे पैशापेक्षा माणसाचा आणि समाजाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
डॉ. बापूसाहेब कांडेकर म्हणाले की, आज नगर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या जरी कमी असली, तरी भविष्यात ती कधीही वाढू शकते. अशावेळी जिल्हा रुग्णालयाचा 12 बेडचा आयसीयू विभागात अपुरा पडेल.
यासाठी नोबलने सर्व सहकारी डॉक्टरांनी डॉ. मुरंबीकर यांच्याशी चर्चा करून आयसीयू सेंटर जिल्हा रुग्णालयात तयार करण्याचा मानस व्यक्त केला. त्याला दोन दिवसात परवानगी दिली. या आयसीयू सेंटरमध्ये 19 व्हेंटिलेटर, मल्टीपर मॉनिटर अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ होईल.