उत्तम पिंगळे
आजकाल आपण पाहतो की वेगवेगळी कॉलेजेस् काढून अनेक शिक्षणसम्राट उदयास आलेले आहेत. पूर्वी शिक्षणास न्यायदान समजले जात असे व तशीच शिक्षण देण्याची प्रवृत्ती असे; पण आता शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे. पण आता मी वेगळाच मुद्दा मांडत आहे. उद्योगाच्या क्षेत्रात बॅकवर्ड इंटिग्रेशन व फॉरवर्ड इंटिग्रेशन असे दोन सप्लाय चेन मॅनेजमेंटचे घटक असतात. एखादा उद्योग त्याच्या उत्पादनास लागणारा कच्चा माल पुरवठा करणारी कंपनी जेव्हा ताब्यात घेतो किंवा स्वतःच तो कच्चा माल निर्माण करतो त्यावेळी बॅकवर्ड इंटिग्रेशन झाल्याचे म्हणतात किंवा एखादा उद्योग उत्पादनाच्या पुढील टप्पा म्हणजे वितरण करणारी कंपनी ताब्यात घेतो किंवा स्वतःच वितरणाचे काम करतो त्यावेळी त्याला फॉरवर्ड इंटिग्रेशन असे म्हणतात.
एक सोपे उदाहरण घेऊ, एखादी कंपनी जर कापड बनवत असेल तर त्याला लागणारा कच्चा माल म्हणजे यार्न किंवा त्याचाही कच्चा माल निर्माण करणाऱ्या कंपन्या ताब्यात घेते वा स्वतःच त्या कच्च्या मालाच्या उत्पादनात जाते त्यावेळी बॅकवर्ड इंटिग्रेशन झाल्याचे म्हणता येईल. पण त्याच कंपनीने जर पुढे आपल्या कपड्यापासून तयार कपडे करावयाचे ठरवले किंवा तयार कपडे करणारी कंपनी ताब्यात घेतली तर त्याला फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणता येईल. यायोगे ही कंपनी आपला उत्पादित माल मार्केटमध्ये जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने कसे जाता येईल ते पाहते. आता तुम्ही म्हणाल की एकीकडे आपण कॉलेजेसबद्दल लिहीत आहात व दुसरीकडे उद्योगाच्या एकत्रीकरणाची गोष्ट करतात. या दोघांचा काय संबंध आहे? तर पहा…
1980 च्या आसपास महाराष्ट्रामध्ये सरकारी सोडून इंजिनिअरिंग कॉलेजेस व पॉलिटेक्निक्स खूपच कमी होती. त्यावेळी कर्नाटक राज्यात अशा संस्था खूप होत्या व तिकडे कामे नव्हती. मग महाराष्ट्रात उद्योगात वा एमएसईबी तसेच इतर सरकारी आस्थापनांमध्ये अनेक दाक्षिणात्य इंजिनिअर्सचा भरभराट होता. आपल्याकडेही खासगी कॉलेजेस् सुरू झाली व आपल्या उद्योगांना येथूनच तांत्रिक मनुष्यबळ मिळू लागले. आपल्याकडे कॉलेजेसचे पेव फुटू लागले. प्रचंड प्रमाणावर इंजिनिअर्स तयार होऊ लागले. आज 10 ते 12 हजारावर कंत्राटांमध्येही काम करणारे इंजिनिअर्स मिळताहेत. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्रात चक्क 60 हजार इंजिनिअरिंगच्या सीट्स रिकाम्या राहिल्या. हे सर्व सांगण्याचे कारण की उद्योगांना येथेच इंजिनिअर्स मिळू लागले म्हणजे यांच्या दृष्टीने ते बॅकवर्ड इंटिग्रेशन झाले. आता तुम्ही म्हणाल कच्च्या मालाची तुलना कामगारांशी करू नये; पण उद्योगांना श्रम लागतातच ना?
त्यावेळी उद्योगांनीही काही कॉलेजेस् काढली. आज अनेक मोठमोठ्या उद्योगांच्या युनिव्हर्सिटीज सुद्धा आहेत. पण आज जे लाखोंनी इंजिनिअर्स तयार होत आहेत त्यांना नोकऱ्या आहेत कुठे? आज कॉम्प्युटर, आयटी, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, कृषी व कृषी आधारित अशा उद्योगांची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मालास शेतावरच उठाव झाला तर त्यांच्या दृष्टीने ते फॉरवर्ड इंटिग्रेशन होईल तसेच तेथे निर्माण होणाऱ्या उद्योगास ते बॅकवर्ड इंटिग्रेशन ठरेल. असे अनेक उद्योग व कारखाने तयार झाल्यास मोठ्या प्रमाणावर तांत्रिक रोजगारही निर्माण होईल. म्हणजे कॉलेजेस्च्या दृष्टीने ते फॉरवर्ड इंटिग्रेशन होईल. मोठमोठ्या कॉलेजमधून निर्माण होणाऱ्या इंजिनिअर्सना जर नोकरी मिळत नसेल तर ती कॉलेज बंद करावी लागतील व आता तसे होऊ लागले आहे. नवीन उद्योगास चालना देणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने शिक्षणसंस्था, उद्योग व सरकार यांनी एकत्रितपणे दीर्घ मुदतीचे धोरण राबवावे लागेल. तसे न झाल्यास प्रशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण होईल. आताच जवळजवळ सहा पूर्णांक एक दशांश टक्के एवढा बेरोजगारीचा दर आहे. बेकारीचा प्रश्न ही धोक्याची घंटा आहे.