पुणे – केंद्र सरकारने नुकतेच तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) विमा काढण्याबाबत आदेश दिले असून परिवहन विभागाच्या “वाहन 4.0′ प्रणालीवर नोंद करण्याचे नमूद केले आहे. विमा प्रमाणपत्राची नोंद “वाहन’ प्रणालीवर नसल्यास, वाहनाचे कोणतेही कामकाज करण्यात येणार नाही, अशी माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.
केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, परिवहन विभागाने सूचना दिल्या आहेत. यानुसार दुचाकी, चारचाकी वाहनांना थर्ड पार्टी विमा प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या सर्व वाहनांना विमा प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच, विमा प्राधिकरणाचे वाहन प्रणालीशी सांधेजोड झाल्यामुळे वाहन मालकामार्फत काढण्यात आलेल्या विमा प्रमाणपत्रांची माहिती आपोआप “वाहन’ या प्रणालीमध्ये दिसून येते. यामुळे बोगस आणि अवैध विमा प्रमाणपत्रांची नोंद “वाहन’ प्रणालीमध्ये होणार नसल्याने गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.
मात्र, ज्या प्रकरणांमध्ये विमा प्रमाणपत्रांची माहिती “वाहन’ प्रणालीवर दिसून येत नाही. अशा प्रकरणांमध्ये सर्वप्रथम वाहन मालकास विमा कंपनीकडे जाऊन संबंधित विमा प्रमाणपत्राची “वाहन 4.0′ प्रणालीवर नोंद करून घेणे आवश्यक आहे. वाहनचालकाने थर्ड पार्टी विम्याची नोंद विमा कंपनीकडूनच करणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत आरटीओ कार्यालयाकडून ही नोंद करण्यात येणार नाही, असे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.