50 लाखाच्या विमा कवचाची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
कोल्हापूर (प्रतिनिधी)- बैत्तुल माल कमिटीने विविध जाती धर्माच्या 55 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्याबद्दल या समितीला सलाम करुया. त्यांच्यासह कोरोना मृतदेहांवर शहरी क्षेत्रात अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी 50 लाखाचे विमा कवच मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागासाठी 50 लाखाचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.
राज्यातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 आणि संशमनी वटी औषधांचे वाटप करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्याचा शुभारंभ येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बाल विकास समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रविण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मालेगावच्या युनानी काड्याचा यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामसेवक,आशा, अंगणवाडी सेविका या सर्वांना सप्टेंबरपर्यंत 50 लाखाचे विमा कवच लागू करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रमाणे जिल्हा परिषदेची बैठकही व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेता यावी. या उद्देशाने आज सदस्यांना टॅबचे वाटप करण्यात येत आहे. व्हिसीद्वारे बैठकीस काही मर्यादा येत असल्या तरी मनात कोणतीही शंका राहता कामा नये यासाठी सदस्यांकडून लेखी प्रश्न घेऊन त्यांना लेखी उत्तरे द्यावीत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढणार आहे. परंतु, मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करा. बेड मिळाला नाही अशी बातमी येणार नाही यासाठी यंत्रणा उभी करा. पोलीस, महसूल, आशा, डॉक्टर जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. यात खासगी रुग्णालयेही चांगले काम करत आहेत. परंतु, अद्यापही काही रुग्णालये चालू करत नाहीत. त्यांच्यासाठी मेस्मा लावावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तपासण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संख्या आणखी वाढणार आहे. राज्यात अनुभव नसतानाही मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री बंटी पाटील यांचेही अतिशय उत्कृष्ट काम सुरु आहे. ही वेळ टीका-टिप्पणी, आंदोलन करण्याची नसून सर्वांनी एकत्र येऊन आलेल्या संकटावर मात करण्याची आहे, असे उदगार ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी काढले.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, ऑनलाईन सभा घेण्यासाठी टॅबचा वापर आता होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली असेल. त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र किती महत्वाची आहेत हे आता लक्षात आले असेल. प्रत्येक सदस्यांनी आपल्या गटात जावून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यांना सुविधा द्याव्यात. व्याधीग्रस्त नागरिकांची यादी घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. जरा जरी लक्षणे दिसली तर त्यांना भेटून उपचारासाठी मार्गदर्शन करा.
गुरुवारपर्यंत आणखी 120 ऑक्सिजनेटेड बेड होत आहेत. रुग्ण शेवटच्या क्षणाला उपचारासाठी दाखल होतो. त्यासाठी लक्षणे दिसताच अंगावर न काढता त्याने दाखल व्हावे. यासाठी प्रत्येकानेच लक्ष द्यावे. हा लढा सामुदायिक आहे. सर्वांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षही पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष श्री. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर शिक्षण सभापती श्री. यादव यांनी आभार मानले. सदस्य जयवंत शिंपी, भगवान पाटील, विजय भोजे, शंकर पाटील, प्रसाद खोबरे, राहूल पाटील, कोमल मिसाळ, विनय पाटील यांना प्रातिनिधिक स्वरुपात टॅबचे वाटप पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी केले. तसेच ग्रामपंचायत कसबा सांगाव, पाचगाव, गडमुडशिंगी,वाठार, आसुर्ले या ग्रामपंचायतींना औषधांचे वाटप करण्यात आले.