संगमनेर – शेतीमालाच्या होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने मिळणाऱ्या भरपाईबाबत शेतकरी, राजकीय पक्षांत तीव्र नाराजी आहे. यंदा संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला. नुकसान भरपाई मिळण्यासाठी तो आग्रही असल्याने आगामी काळात उद्रेक टाळण्यासाठी विमा कंपनीकडून मुदतीनंतरही नुकसान सूचना अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
खरीप हंगामात ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची नेमणूक केली आहे. तालुक्यात 16 हजार 158 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा काढलेला आहे. त्यांचे संरक्षित क्षेत्र 12 हजार 99 हेक्टर एवढे आहे. विमा कंपनीतर्फे खरीप पिकांच्या काढणीपश्चात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते.
त्यासाठी कंपनीकडून पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे नुकसान सूचना अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी 7 नोव्हेंबर ही मुदत होती; परंतु या काळात केवळ 931 शेतकऱ्यांनी 878 हेक्टरवरील नुकसान सूचना अर्ज भरून दिले होते. हे प्रमाण फार कमी होते.
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हे अर्ज तालुका कृषी कार्यालयात स्वीकारले जात होते. मोठ्याप्रमात अर्ज महसूल, कृषी व ग्रामसेवक याच्याकडे जमा झाले असून ते लवकरच सबंधित विमा कंपनीला देण्यात येणार असल्याने खरीप हंगामात पीकविमा काढलेला पिकांचे नुकसान सूचना अर्ज जमा करण्याची आकडेवारी वाढणार आहे.
पीककापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई
महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्णत्वाकडे आले आहेत. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पिकांच्या झालेली नुकसानभरपाई महसूल यंत्रणेतर्फे केलेल्या पीककापणी प्रयोगाच्या आधारावर देण्यात येणार आहे.