नवी दिल्ली – सध्या विविध भागांमध्ये कांद्याचे दर 75 रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. कांद्याचे दर कमी होण्यास मदत व्हावी याकरिता केंद्र सरकारकडे असलेल्या राखीव साठ्यातून राज्यांनी कांदा घ्यावा, असे केंद्र सरकारने राज्यांना कळविले आहे.
दरम्यान, केंद्राने साठेबाजीला आळा घालण्याचा उपाय जाहीर केला आहे. आता किरकोळ दुकानदारांना दोन टन व घाऊक व्यापाऱ्यांना 25 टनापेक्षा जास्त कांद्याचा साठा करता येणार नाही.
ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी सांगितले की, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांनी 8 हजार टन कांदा घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतर राज्यांच्या प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे.
केंद्राच्या वतीने नाशिक येथे कांद्याचा साठा केला जातो. केंद्राने कांदा 26 ते 28 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला आहे. त्या दरावर राज्यांना कांदा घेऊन जाण्यास सांगितले आहे. राज्यांना जर त्यांच्या राज्यात कांदा हवा असेल तर दर 30 रुपये प्रति किलो करण्यात आला आहे.
दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांदा खरेदी करून ठेवला आहे. त्यातील 30 हजार टन कांदा अगोदरच राज्यांना दिला आहे. खरिपामध्ये कांद्याचे 37 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता असून लवकरच हा कांदा बाजारपेठेत उपलब्ध होईल. गेल्या काही दिवसात काही राज्यात पाऊस पडत असल्यामुळे कांद्याच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत.
कांद्याचे दर वाढू नयेत याकरिता केंद्र सरकारने अगोदरच कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. त्याचबरोबर आयातीवरील निर्बंध कमी केले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने कांदा खरेदी करणाऱ्यांना नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमी दरातील कांदा विविध शहरातील घाऊक बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.