सोलापूर(प्रतिनिधी) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी त्यांनी तब्बल दीड तास शासकीय बैठक घेऊन विविध योजना आणि विकास कामांचा आढावा घेतला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आज शासकीय आढावा बैठकीत विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरिता सरकारची कृषि सौरवाहिनी या कार्यक्रमाला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देऊन सौर प्रकल्प उभारण्याचा मानस आहे.
जलयुक्त शिवार अंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे 168 गावांमध्ये काम सुरू होत आहे त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आहे. जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात तीन लाख 17 हजार हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन उपलब्ध करून दिले आहे. म्हणूनच जलयुक्त शिवार दोन टप्पा हा वेगाने पुढे नेणार आहोत.
सोलापूरच्या विमानसेवा आणि पाणी प्रश्नावर फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, सोलापूरच्या विमान सेवेचा प्रश्न अंतिम टप्प्यात आणलेला आहे. चिमणीचा प्रश्न जो ऐरणीवर आहे. त्याचाही मी पाठपुरावा करतोय त्यांना नोटीस दिली आहे, सोलापूरकरांच्या मनासारखी कारवाई यामध्ये होईल, असेही फडणवीसांना बोलताना म्हटले.
समांतर जलवाहिनीचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. त्याच्यातील अडचणी संपल्या आहेत लवकरच त्याचे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले.