मुंबई – जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी एसआयटीमार्फत होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना राज्य सरकारने दिलेला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत भाजपवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले कि, जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. https://t.co/AAkrL9Q6T1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2020
याआधीही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे जलयुक्त शिवारची चौकशी करण्याची मागणी केली होती. ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजल पातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले होते.
दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 9 हजार कोटी खर्च झाला. मात्र त्याचा फायदा काहीच झाला नाही. योजना राबवूनही राज्यात टॅंकरची संख्या वाढली असून भूजल पातळी वाढली नाही. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचे कॅगने म्हटले होते.