मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे आपल्या एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. “माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो’, असे विधान त्यांनी केले आहे. यावेळी त्या चंद्रपूरमध्ये एका सभेत बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही.
त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. पण मी माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे.’ असं विधान त्यांनी यावेळी केलं आहे. सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत.