राजगुरुनगर – राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी करूनही गतिरोधक बसवला जात नाही. यामुळे या सर्वांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान आज शाळा भरण्याच्या सुमारास पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने पालकांमध्ये सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषेदच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे.
राजगुरुनगर शहरात कोर्ट रस्त्यावर हुतात्मा राजगुरु विद्यालय असून येथील शाळेत 5 वी ते 10 वीत सुमारे 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भीमानदीवर नव्याने पूल झाल्याने शहरातील वाहतूक या शाळेजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे पुलावरून पुणे आणि कडूसच्या दिशेने जाते. हा रस्ता पाण्याच्या टाकीपासून ते कडूस रस्त्यापर्यंत कॉंक्रीटीकरण झाल्याने व रस्त्याला गतिरोधक नसल्याने शिवाय रस्ता उतारावर असल्याने वाहनाचा वेग जास्त असतो. येथून जाणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या जास्त आहे.
नदीवर मोठा पूल व त्याला जोडणारा कॉंक्रीटचा रस्ता झाल्याने भरधाव वाहनांमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या अपघाताची संख्या जास्त आहे. कोर्ट चालू असताना सर्व वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याने रस्ता अरुंद होतो. विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचण होत आहे. शाळेजवळ गतिरोधक त्वरित बसवावा अन्यथा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसह या रस्त्यावर रस्ता रोकोचे आंदोलन केले जाईल असा इशारा विद्यार्थी पालकांनी दिला आहे.
रस्ता ओलांडताना पाचवीत शिकणाऱ्या अर्णव सोमनाथ इप्पर (वय 11) या विद्यार्थ्यांला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने ठोकर दिली. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने कानातून व नाकातून रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. असे अनेक विद्यार्थ्यांना अपघात झाले आहेत. बांधकाम विभाग व नगर परिषदेकडे दोन वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक नागरिकांनी व पालकांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप येथे गतिरोधक बसवला नाही. शाळेसमोर तत्काळ गतिरोधक व सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे.
-विनोद लोंढ, मुख्याध्यापक