नवी दिल्ली – समाज बदलण्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त एक प्रयत्न, एक उदात्त हेतू आणि बदल घडवून आणण्याची जिद्द. अशाच काही जिद्दीसाठी दिल्लीचे दोन भाऊ देशाला मोठा संदेश देत आहेत. एका छोट्याशा प्रयत्नाने मोठा बदल घडवून आणण्याचा, सेवेची भावना पुढे नेण्याचा हा संदेश आहे. हे दोन भाऊ दिल्लीतील सुमारे २३ लाख गरीब जनतेसाठी आशेचा किरण बनले आहेत. ते अतिशय स्वस्त दरात सर्वांना अन्न पुरवत आहेत. त्यांच्या या महान कार्याची दखल घेत त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
5 रुपयात पूर्ण जेवण, पैसे नसले तरी मिळेल जेवण
हा केवळ सेवाभाव नसून लाखो बेघर लोकांसाठी जगण्याचे साधन आहे. जो कोणी येईल, कोणत्याही परिस्थितीत असेल असा कोणताही भेदभाव नाही, हे दोन भाऊ कोणालाच रिकाम्या पोटी परतत नाहीत, सर्वांना जेवन दिले जाते. त्यांचे ध्येय एकच, माणुसकी वाढवणे आणि गरजूंची सेवा करणे. दिल्लीतील पीतमपुरा येथे या दोन भावांचे स्वयंपाकघर चालवले जाते.
या स्वयंपाकघरात दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत 800 ते 1000 लोकांसाठी जेवण तयार केले जाते. दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत गरीब व गरजू लोकांना जेवण दिले जाते. एका थाळीची किंमत फक्त पाच रुपये आहे. ते पाच रुपये जर कोणाकडे नसतील तरी त्यांना रिकाम्या पोटी परत जाऊ दिले जात नाही, त्यांना मोफत जेवण दिले जाते.
अशोक अरोरा राबवत आहेत समाज बदलण्याची मोहीम
व्यवसायाने प्रॉपर्टी बिल्डर असलेल्या अशोक अरोरा यांची सेवा रसोई फाउंडेशन 11 जून 2021 पासून गरीब, निराधार आणि गरजू लोकांच्या पोटाची भूक भागवत आहे. 2020 मध्ये, करोना संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी अशोक अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ई-रिक्षाद्वारे गरीब आणि बेघर लोकांना लंगरचे वाटप करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मोहिमेला यश आल्यावर त्यांनी जून 2021 पासून सेवा रसोई सुरू केली. सेवा रसोई फाऊंडेशन पीतमपुराच्या राणीबागेतच नाही, तर शकूर वस्ती रेल्वे स्थानकाजवळ अशीच मोहीम राबवत आहे. शकूर वस्ती रेल्वे स्थानकाजवळ दररोज संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान सुमारे 300 बेघर लोकांना अन्न दान केले जाते.