नगर – नगर तालुक्यातील पंचायत समिती अंगणवाडी, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या चांगल्या योजनांची दखल घेऊन या योजनेची तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना प्रेरणा देण्यासाठी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी अशिमा मित्तल यांनी ग्रामसंजीवनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नगर तालुका पंचायत समिती मार्फत प्रथमच ग्रामसंजीवनी हा उपक्रम आगाडगाव येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, गटविकास अधिकारी आशिमा मित्तल, पंचायत समिती सभापती कांताबाई कोकाटे, रविंद्र भापकर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ल, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ,रामदास भोर, संजय केदार, संदिप गुंड, रविंद्र कडूस, प्रविण कोकाटे, आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, बलभीम कराळे, चंद्रकांत खाडे, किशोर जगताप उपस्थित होते. ज्या लोकांनी गावात यशस्वी उपक्रम राबवले त्या कामाची यशोगाथा ग्रामसंजीवनी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या विकासकामाची प्रेरणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने घेतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आगडगाव येथे करण्यात आले. नगर तालुक्यातील विविध भागांमधून ज्यांनी उपक्रम राबवले त्यांनी आपली यशोगाथा यावेळी मांडली. यामध्ये स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत आठवड, जलशुद्धीकरण प्रकल्प, ग्रामपंचायत निंबोडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, मांजरसुंबा गावातील बायोमेट्रिक हजेरी, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण, बाबुडी घुमट येथील ग्रामपंचायतीने राबवलेली जलमापक, जिल्हा परिषद शाळा चिचोंडी पाटील, प्लॅस्टिक मुक्त, चिंचोडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोसपुरी येथील पाणीपुरवठा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बायोगॅस यशोगाथा, प्रधानमंत्री रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल, वैयक्तिक सिंचन विहीर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक गोठा कॉंक्रिटीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळकी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भिंगार, अंगणवाडीतील बाल चमूचे ढोल पथक, प्रांजल महिला स्वयंसहायता समूह शेंडी, जय मल्हार बचत गट गोंधळा, नागरदेवळे मल्हारी मार्तंड स्वयंसहाय्यता समूह, मुरघास युनिट मुळे दुष्काळातही हिरवा चारा खाद्य, गावची स्मशानभूमी, सौर ऊर्जेतून ग्राम विकास याविषयी माहिती नागरीकांनी दिली. यावेळी पंचायत समिती मधील विविध विभागातील अधिकारी, सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.
नगर तालुका पंचायत समिती मार्फत राबविण्यात आलेला ग्रामसंजीवनी हा उपक्रम ग्रामीण भागाला दिशादर्शक ठरेल. चांगल्या कामाची प्रेरणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती घेतील व आपल्या गावात या कामाची अमंलबजावणी करतील.
शिवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद