दत्तात्रय आंबुलकर
गेली 13 वर्षे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील खामखेड येथील निवासी गुलाबराव हागे गुरुजी हे तेथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या माध्यमातून भरपूर पाणी अडवितात. परिणामी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे, अशा प्रकारे शेतकऱ्यांना पाण्याचे महनीय सहकार्य करणाऱ्या गुलाबराव हागे गुरुजी यांनी पंचक्रोशीतील नागरिक-शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी काम केले आहे.
या आधुनिक भगीरथाचे कार्य म्हणजे खामखेड परिसरातील 700 ते 800 एकर जमीन ओलिताखाली आली असून हा बंधारा हंगामी तसेच रब्बी पिकासाठी जीवनदायी ठरला आहे. उत्कृष्ट नियोजन व योग्य पद्धतीने पाणी अडविल्यामुळे खामखेड, कुपटा, सांगवी, देगाव, धनेगाव, मानकी व वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
या विशेष पुढाकार आणि प्रयत्नांबद्दल खामखेड येथे श्रीबलखंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या गुलाबराव अमृतराव हागे गुरुजी यांचा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला हे लक्षणीय आहे.
तसे पाहता 1999 मध्ये हा बंधारा बांधून झाल्यावर त्याकडे तसे सर्वांनीच दुर्लक्ष केले. परिणामी पाणीवाटपावर विपरीत परिणाम झाला व शेतकऱ्यांना त्याद्वारे पुरेसे पाणी त्यांच्या शेतीसाठी मिळाले नाही. अनेकांनी यावर ओरड केली पण मार्ग कोणीच काढला नाही हे पाहून 2005 मध्ये गुलाबराव यांनी शेतकऱ्यांची पाणीविषयक समस्या जाणून या बंधाऱ्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी याप्रकरणी पाठपुरावा करून योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकारी-शेतकऱ्यांना प्रेरित केले.
याशिवाय गुलाबरावांनी पाणी-बंधारा बांधून पाण्याचे जलसंवर्धन व साठवणूक करण्याच्या जोडीलाच बंधाऱ्यातील पाणीवाटपाचे नियोजन-वितरण करण्यासाठी शेतकरी सभासदांची सहकारी संस्था तयार केली व तिला कार्यरत-सक्षम केले. सोसायटी स्थापनेच्या सुरुवातीला आवश्यक असे प्रयत्न गुलाबरावांनी स्वयंप्रेरणेनेच नव्हे तर प्रसंगी स्वखर्चाने देखील केले. सोसायटी स्थापनेनंतर गेली 13 वर्षे गुलाबराव आपली जबाबदारी मोठ्या नेटाने व प्रयत्नपूर्वक पार पाडत आहेत.गुलाबरावांनी शेतकरी सहकारी सोसायटीसाठी केलेल्या महत्त्वाच्या व उल्लेखनीय कामांमध्ये पाणीवाटप पंपात बिघाड झाल्यास प्रसंगी वेल्डिंगसह त्याची दुरुस्ती करणे, पाण्याचे लिकेज दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय टाळणे, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे नियोजन करून हे काम घडवून आणणे, कचरा काढून त्याची विल्हेवाट लावणे, या साऱ्या कामाचा व खर्चाचा नेमका हिशेब ठेवणे व मुख्य म्हणजे सदस्यांच्या गरजांनुरूप वाटप करणे ही सारी कामे ते करीत असतात.
आज शेतकरी सरकारवर खते-बियाण्यांपासून कर्ज आणि कर्जमुक्तीसारख्या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध बाबींवर अवलंबून असताना गुलाबराव यांचे नेतृत्व आणि प्रेरणेतून स्थापन झालेला खामखेड येथील शेतकरी सहकारी पाणी बंधारा उपक्रम आज 10 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. विशेष म्हणजे गाव आणि गावकऱ्यांच्या सहभागावर व शासनाच्या मदतीविना हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. यातच या प्रकल्पाचे यश दडले आहे.