सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अकरावी आणि बारावी प्रवेश प्रक्रिया राबवत असताना शिक्षण विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी माध्यमिक शिक्षण विभागाच्या आठ पथकांमार्फत जिल्ह्यात 11 महाविद्यालयांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. तक्रारींची गांभीर्याने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे अकरावी आणि बारावी प्रवेश प्रक्रिया राबवताना महाविद्यालयांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या. मात्र, या सूचना गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. प्रवेश प्रक्रियेत सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. सॅनिटायझर, मास्क याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आठ पथकांमार्फत सातारा, पाटण, कराड, दहिवडी, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण येथे अचानक भेटी देऊन तपासणी केली.
आठ पथकांमध्ये उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांचा समावेश होता. प्रवेश प्रक्रियेसाठी अवलंबिलेली पद्धत, गर्दी होऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजना, मंजूर क्षमता व प्राप्त अर्ज, लिंक व वेबसाइटची माहिती, शुल्क आकारणी व त्याबाबतचे शिक्षक पालक संघाच्या सभेचे इतिवृत्त, मदत कक्ष, विनाअनुदानित प्रवेश, दिव्यांगांची व्यवस्था, प्राचार्यांचे प्रवेश प्रक्रियेवरील नियंत्रण, गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यासाठी केलेली व्यवस्था यासह अनुषंगिक बाबींची तपासणी करण्यात आली. यापुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याबाबत सर्व महाविद्यालयांना लेखी सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे.