ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णांची वाढती संख्या पाहून आज केंद्रीय आरोग्य पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची आढावा बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यात कशाप्रकारे उपाययोजना केल्या गेल्या आहेत याची माहिती घेतली. या पथकाचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास देखील उपस्थित होते.
या पथकातील सदस्यांनी पालिकांना मृत्यूदर कमी करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या, अशा सूचना दिल्या. तसेच जास्तीत जास्त चाचण्या करा जेणेकरुन रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करता येतील अशाही सूचना दिल्या. वाढती रुग्णसंख्या पाहून घाबरुन न जाता लोकांना वेळेत उपचार घेण्यासाठी उपाय योजना आणि त्याची अंमलबजावणी करा, असेही केंद्रीय पथकाने सांगितले.
केंद्रीय पथकाने सुरुवातीस मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करुन तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देवून माहिती घेतली. दिल्लीवरुन आलेले हे पथक विमानतळावरुन थेट मुंब्रा येथे दाखल झाले. ठाणे शहरातील पाहणी करुन मग त्यांनी आढावा बैठक घेतली.