डॉ. विखे यांच्या प्रचाराची वडगाव गुप्ता सांगता
नगर: ही निवडणूक मतदारसंघासाठी निर्णायक आहे. पुढच्या पिढीच्या भविष्याची महत्वाची आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभलनाला बळी न पडता आपल्या मुलाबाळांचा, त्यांच्या भवितव्याचा विचार करुन या मतदारसंघात दहशत माजविणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड मतदानाद्वारे करावा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
वडगावगुप्ता येथील प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. नगर तालुक्यातील रुईछत्तीशी, दरेवाडी, वडगावगुप्ता येथे डॉ. विखे पाटील यांनी पदयात्रा काढून सभा घेतली. यावेळी विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षापासून दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एक भूमिका घेऊन मतदारांसमोर गेलो. प्रामाणिकपणे दक्षिणेच्या प्रश्नांवर शाश्वत उपायांचा अभ्यास करुन एक सकारात्मक विचार व भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुदैवाने राष्ट्रवादी कॉंग्रसने ही निवडणूक व हा लोकशाहीचा उत्सव खालच्या पातळीवर व व्यक्तीगतस्तरावर नेवून एकप्रकारे लोकशाहीच्या मुल्यांना हारताळ फासून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
आजही ही सांगता सभा घेताना विरोधी उमेदवार व्यक्तीगत टिका टिपण्णीच्या पलिकडे गेले नाही. ही निवडणूक विखे पाटलांच्या घरातील कुरबुरीची नसून 18 लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेबाबत आहे. त्यामुळे ह्या केविलवाण्या व लाजिरवाण्या प्रचाराला मतदार माझ्या वतीने चोख उत्तर देतील व परत एकदा मोदी सरकारवर विश्वास दाखवतील, याची आपल्याला खात्री वाटते असे ते यावेळी म्हणाले.
ना. औटी म्हणाले, आपल्या शेजारी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती विकासित झाल्या आहे. परंतु जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती अर्धमेल्या झाल्या आहेत. या औद्योगिक वसाहतीमधुन उद्योगपतीनी पलायन केले. ते कोणाच्या दहशतीमुळे हे जनतेला कळुन चुकले आहे. त्यामुळे मतदारांनी डॉ.सुजय विखे पाटील सारख्या पर्याय निवडावा असे आवाहन केले.