मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. 2014 ते 2019 या काळात पायाभूत सुविधांकरता 6500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, पुन्हा 2020 मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा 2300 कोटींची कामे करावी लागत आहेत.
2014 ते 2019 या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
आधीच 6500 कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या 6500 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळातील उर्जाविभागाच्या 6500 कोटींच्या कामांच्या चौकशी करता वरील चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती 1 डिसेंबर 2021 पूर्वी अहवाल सादर करणार आहे.