नवी दिल्ली – रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामी आणि बीएआरसी संस्थेचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद व्हायरल झाल्यानंतर यातून अनेक गंभीर बाबी उघड झाल्याने या प्रकरणाची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.
अर्णव गोस्वामी यांना बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती प्रत्यक्ष हल्ला होण्यापुर्वीच मिळाली होती.राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या माहितीचा टीआरपीसाठी वापर केला गेल्याची बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे याच्या जेपीसी चौकशीची गरज आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की या प्रकरणात आम्ही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चॅटगेट प्रकरणात खुलासा करावा अशी मागणी राज्य सरकारकडून त्यांच्याकडे केली जावी अशी मागणी आम्ही करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
अर्णव यांना ही संवेदनशील माहिती कोणी दिली याची तातडीने चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणीही तपासे यांनी केली. मुंबई पोलिस आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या बदनामीचे काम अर्णव यांच्या रिपब्लीक टीव्हीने केले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.