मुंबई : रिझव्र्ह बँकेने देशातील सर्व बँकांना अदानी समूहाला दिलेल्या कर्जाचा संपूर्ण तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २०,००० कोटी रुपयांच्या समभाग विक्री (एफपीओ) प्रक्रियेमधून माघारीचा आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा तडकाफडकी निर्णय अदानी समूहाने घेतल्यानंतर रिझव्र्ह बँकेने समूहाला आणखी एक धक्का दिला असल्याचे म्हटले जात आहे.
भांडवली बाजारात अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना मोठ्या पडझडीचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकिंग नियंत्रकांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुईसने कर्जासाठी तारण म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांकडून रोखे स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. त्यानंतर रिझव्र्ह बँकेनेही वाणिज्य बँकांकडून समूहाला दिलेल्या कर्जाविषयीचा तपशील मागवला आहे. परिणामी गुरुवारी सलग सहाव्या सत्रात समूहातील बहुतांश कंपन्यांचे समभाग घसरले. समूहातील सूचिबद्ध १० कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्याचे तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमेरिकास्थित गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार आणि समभागांच्या किमती फुगवणाऱ्या लबाडय़ांसह अनेक आरोप केले आहेत. अहमदाबादमध्ये मुख्यालय असलेल्या या समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विश्लेषक आणि गुंतवणूकदारांना ते पटवून देण्यात तो अपयशी ठरला आहे. रिझव्र्ह बँकेला देशातील वाणिज्य बँकांकडून बडय़ा उद्योगांना दिल्या जाणाऱ्या मोठय़ा रकमांच्या कर्जाचा केंद्रीय रिपॉझिटरीच्या माध्यमातून ‘सीआरआयएलसी’ विदा प्रणालीतून नित्य माहिती मिळत असते. शिवाय अनेक वेळा समभाग गहाण अथवा तारण ठेऊनही बँकांकडून कर्ज दिले जाते.
अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यात मागील सहा सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे, कर्जाच्या बदल्यात तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी झाले असण्याची शक्यता आहे. याची चाचपणी करण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून हा तपशील मागवला गेला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने अदानी समूहाला दिलेले कर्ज हे रोख प्रवाह उत्पन्न करणाऱ्या मालमत्तेद्वारे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेनेही समूहाला दिले गेलेले एकंदर ७,००० कोटी रुपयांचे कर्ज सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. बँक ऑफ बडोदानेही ४,००० कोटी रुपयांचे कर्जदायीत्व असणाऱ्या अदानी समूहाकडून नियमित परतफेड सुरू असल्याचे नमूद केले. तर देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) अदानी समूहातील ३६,४७४ कोटी रुपयांची गुंतवणूक व्यवस्थापनाखालील गुंतवणूक गंगाजळीच्या (एयूएम) एक टक्काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.