वाघोली (प्रतिनिधी) – केसनंद तालुका हवेली येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केसनंद शाखेच्या शाखाप्रमुख अनिल गायकवाड यांच्याकडून मनमानी कारभार चालवला जात असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजप नेते सातव यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप सातव यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की बँकेची केसनंद तालुका हवेली येथे शाखा असून बँकेचे नोकरदार, शेतकरी, कामगार, कारखानदार हे खातेदार असून बँकेचे पासबुक बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळेवर अपडेट करून दिले जात नाही. शिवाय बँकेकडून नवीन खाते उघडण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. सी टी एस प्रणालीचे चेक वटवण्याचे काम देखील आठ-आठ दिवसानंतर होत असून नागरिकांना चेक वटवण्यासाठी आठ दिवसाहून अधिक काळाची वाट बघावी लागत आहे.
जाणीवपूर्वक नागरिकांचे पैसे खात्यात येण्या ऐवजी बँकेच्या शाखाप्रमुखांकडून टाळाटाळ केली जात आहे. बँकेचे कर्मचारी हे वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांना बँकिंग व्यवहारासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामपंचायत केसनंद यांच्या वतीने महावितरण चे वीज बिल भरणा केंद्र बँकेत सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार होऊन देखील ही सुविधा गेल्या चार महिन्यापासून बँकेकडून सुरू करण्यात आली,
नसून यास आपल्या बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल गायकवाड हे जबाबदार आहेत अनेक दिवसांपासून बँकेचे शाखा व्यवस्थापक हे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसून त्यामुळे कंत्राटदार कर्मचारी पासून इतर सर्व कर्मचारी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करू लागले आहेत असा आरोप सातव यांनी केला आहे.
केसनंद बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची चौकशी करून तसेच मागील महिन्यांचा सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर तात्काळ बदलीची अथवा निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
– संदीप सातव नेते, भाजप पुणे जिल्हा
चेक वटवण्याच्या बाबतीत झालेली दिरंगाई या पुढील काळात होणार नाही. याबाबतची खबरदारी घेतली जाईल.
– अनिल गायकवाड शाखा व्यवस्थापक,