हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा
मंचर-नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर लोकशाहीच्या मार्गाने जवान चंदु चव्हाण यांनी आमरण आंदोलन सुरू केले होते; पण दिल्ली पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत त्यांचे साहित्य फेकून दिले व त्यांना अटक केली. दिल्ली सरकारच्या या घृणास्पद घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अन्यथा हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा संस्थापक अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला.
यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात बाबाजी चासकर म्हणतात की, चंदू चव्हाण सध्या कोठे आहेत. याबाबत काहीही माहिती नाही. लवकरात लवकर तपास करून त्यांचा ठावठिकाणा जनतेसाठी जाहीर करावा. पाकिस्तानच्या काळ्या कोठडीमधून 3 महिने 21 दिवसानंतर सहीसलामत सुटून भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांचा छळ अद्यापही संपलेला नाही. पाकिस्तानातून सुटून आल्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला.
पाकिस्तानमधून परतल्यापासून सतत चौकशी केली जात आहे. त्यांना 90 दिवसांची शिक्षा देण्यात आली. शिवाय, मनोरुग्ण म्हणून रुग्णालयात धाडण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल अगदी नॉर्मल आला. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना वेतन नाही. मोबाईल व ओळखपत्र जप्त केले आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा छळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याला निवेदन देतेवेळी संतोष बाणखेले, गणेश घोडेकर, विक्रांत पडवळ, अनिकेत टेमगिरे, राहुल भानुदास पडवळ, सुधीर एटमे, प्रशांत चिखले, मयुर पडवळ, अजित आवटे, गौरव बारणे उपस्थित होते.