पुणे – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागातील सहायक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियानाला’ सकारात्मक प्रतिसाद देत नावीन्यपूर्ण संशोधन करून तीन पेटंट दाखल केले आहे.
इंग्लंड, चीन, भारत संपूर्ण जगात प्लॅस्टिकच्या जास्तीत जास्त निर्मितीस हातभार लावतात. भारतात सुमारे दहा हजार टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. पॉलिमरचा मोठा संचय जगातील सर्व देशांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. पॉलिमर डिग्रेडेशन हा शब्द प्रक्रियेसाठी वापरला जातो. यातून पॉलिमरच्या बाह्य स्वरुपासह रासायनिक व भौतिक गुणधर्म कमी केले जातात.
केमिकलद्वारे थर्मल, फोटो ऑक्सिडेटिव्ह, जैविक, पॉमिलर डिग्रेडेशन पद्धतीचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. यावर “एआयएसएसएमएस’ रसायन अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. आशिष मोहोड, भारती विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. मनीषा बागल आणि त्यांच्या विनायक राजन, मयुर मालुसरे, शुभम शिंदे, हर्षल अंबुलकर, कुणाल रांजणे या संशोधन चमूने एक नवी पद्धत विकसित केली आहे. प्लॅस्टिक प्रदूषण, जल प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया यावर व्यापक संशोधन करुन त्यांनी पेटंट दाखल केले आहेत.
संशोधन करणाऱ्या टीमची प्रशंसा
संशोधन पथकाने जैविक इंधनाचे विश्लेषण आणि पॉलिमरचा ऱ्हास यावर आधारित नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. यशस्वी प्रयोगासाठी त्यांनी पोकळी निर्माण करण्यासाठी काचेच्या पोकळी निर्माण करणाऱ्या वस्तूंचा (काचेच्या गोट्या) वापर केला आहे. या पोकळी निर्मितीच्या मदतीने बायोडिझेलचे 98 टक्के उत्पादन व 90 टक्के पॉलमिर कमी झाले. प्रदूषित जलातील 100 टक्के घातक रसायनयुक्त रंग काढून टाकण्यातही या पथकाने यश मिळविले आहे. संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती, प्राचार्य डॉ. एस. बोरमने, विभाग प्रमुख डी. पी. एन. डांगे यांनी संशोधन करण्याऱ्या टीमची प्रशंसा केली आहे.