नाशिक – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’या पुस्तकातील काही मजकूरावरून वाद सुरु आहे. या वादातूनच आज नाशिक येथे सुरु असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे.
या मजकूरावरून सुरु आहे वाद ?
गिरीश कुबेर लिहतात, “छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांनाही ठार केले, त्यातील काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मडळातील होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली चांगली फळी नष्ट झाली. याची किंमत नंतर छत्रपती संभाजी महाराजांना मोजावी लागली”. या मजकूरावरून कुबेर यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. दरम्यान, संभाजी महाराजांनी आपल्या सावत्र आई सोयराबाईंची हत्या केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कुबेर यांच्यावरील शाईफेक हल्ल्यानंतर काही जणांनी या घटनेचे समर्थन केले असून अनेकांनी निषेध नोंदवला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले की, या सर्व घटनेचा मी निषेध करतो. गिरीश कुबेर जेष्ठ पत्रकार, वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत. त्यांनी काही लिखान केले असेल किंवा करत आहेत, त्याबाबत मतभेद असू शकतात. गेल्या काही काळात हा वाद झाला होता. तो मी वाचलाय. मुळात त्यांनी काय लिहिले आहे? हे किती लोकांनी वाचले आहे? न वाचता त्यांच्यावर मराठी साहित्य संमेलन सुरु असताना शाईफेक करणे चुकीचे आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारचे कृत्य करणे हे कुणालाही मान्य होणार नाही. ज्यांना कुबेर यांचे लिखान पसंत नाही, त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी, पुरावे द्यावे. पण अशाप्रकारे शाईफेक करणे चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.