मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. या ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. त्यामुळे इथल्या नागरिकांचे जेवणासाठी हाल होऊ नये यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते रोज पूरग्रस्त भागातील लोकांना ताजे जेवण पुरवण्याचे काम करत आहेत.
राज्यातील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून ही टीम 30 जुलैपासून पूरग्रस्तांना दररोज एकूण 15 हजार थाळी ताजे जेवण पुरवत आहे.
Due to incessant rains, regions in Maharashtra including Chiplun & Mahad have been severely affected. Along with @WCKitchen and @TajHotels @tajsats we’ve started distribution of 15,000 meals a day to those affected by the floods in these areas. pic.twitter.com/JFYmmaULs1
— Sanjeev Kapoor (@SanjeevKapoor) July 30, 2021
या उपक्रमाविषयी बोलताना संजीव कपूर म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही.
माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
कोव्हिड-१९ ने संपूर्ण देशाला विळखा घातला असताना, मास्टरशेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत शेफ कपूर आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ जोस अँड्रेस यांनी दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनौ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.