राजू शेट्टी ः तातडीने मदत न दिल्यास राज्यभरात उग्र आंदोलन
कोल्हापूर : नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. परतीच्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ते कोल्हापुरात बोलत होते. परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले असून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत सरकारने तातडीने मदत न दिल्यास राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन राज्यभरामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीक गेले आहे.
या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे नुकतेच आदेशित केलेले आहे. अनेक ठिकाणी भात, कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांची विचारपूस करायला आज कुणालाच वेळ नाही. प्रशासनानेही शेतकऱ्यांकडे डोळेझाक केली आहे, असा आरोपही शेट्टींनी केला. पंचनाम्यांबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी यासाठी राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.