मुंबई – भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाने उत्तम प्रगती केली आहे. स्वतःला मदत करण्याबरोबरच या उद्योगाने इतर उद्योगांनाही मदत केली आहे. देश-विदेशातील इतर उद्योग माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. आगामी काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची उलाढाल झपाट्याने वाढणारा असल्याचे विप्रो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी सांगितले.
चार्टर्ड अकाउंटंटच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रेमजी म्हणाले की, लॉक डाऊनच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र नसते तर सर्वसामान्य लोकांवर त्याचा प्रचंड परिणाम झाला असता. मात्र हा परिणाम माहिती तंत्रज्ञान उद्योगने कमी केला. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व इतरांना कळाले आहे.
नॅसमॉम या माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या शिखर संघटनेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची उलाढाल 194 अब्ज डॉलरवर जाणार आहे. पहिल्या तिमाहीचे ताळेबंद गुरुवारपासून सादर होणार आहेत. यावरून या क्षेत्राची सध्याची परिस्थिती कशी आहे या संदर्भात अंदाज येण्यास मदत होणार आहे.
गेल्या वर्षी परिस्थिती खराब असूनही या क्षेत्राची उलाढाल दोन ते तीन टक्क्यांनी वाढली. या क्षेत्रात दीड लाख नवीन रोजगार निर्माण झाले. लॉक डाऊन सुरू झाल्याबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 90 टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले. त्यातील बराच भाग अजूनही घरातूनच केला जातो. आगामी काळातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही कमी होतो.
भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वापर आगामी काळात वेगाने वाढणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. भारताने पुढील काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठे योगदान राहणार असल्याचे प्रेमजी यांनी सांगितले.