Weather Alert: उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट कायम असून पुढील संपूर्ण आठवडाभर तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह उत्तर प्रदेशात उष्णतेची तीव्र लाट धडकली असताना महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या विशेष बुलेटिननुसार, २४ मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते. मात्र, १९ मेपासून राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कुठे किती तापमान – उत्तर भारतात सोमवारी अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या जवळ पोहोचले. पंजाबमधील भटिंडा येथे ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राजस्थान आणि हरियाणातील काही भागांत पारा ४६ अंशांच्या पुढे गेला. दिल्लीत कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून पुढील दोन दिवसांत ते ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. राजस्थानातील पिलानी आणि चित्तौडगड येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जयपूरमध्ये ४३.६ अंश तापमान होते. उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हवामानतज्ज्ञ महेश पलावत यांनी सांगितले की, राजस्थानातील थार वाळवंट आणि पाकिस्तानच्या कोरड्या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील दहा दिवस पावसाची शक्यता नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना महत्वाची सूचना – दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील आरोग्य सेवा महासंचालनालयाने नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलक्या सुती कपड्यांचा वापर करावा आणि इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये व हंगामी फळांचे सेवन करावे, असा सल्ला दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी सावलीची व्यवस्था, नियमित पाण्याचे ब्रेक आणि उष्माघाताच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.