चिंबळी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मोशी (ता. खेड) येथे असलेल्या टोल नाक्यावरील वाहतुकीवर “करोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ ते दहा दिवसापासून 70 ते 80 टक्के परिणाम झाला असल्याचे पथकर व्यवस्थापक धनजंय पणशीकर यांनी सांगितले
पुणे-नाशिक महामार्गावरील प्रमुख असलेल्या मोशी टोल नाका कायमच वर्दळीचा आणि टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चर्चेत असतो. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून या परिसरातील वाहतूक कमी झाली आहे. पुणे-नाशिक या ठिकाणी परदेशवारी करून आलेले करोनाचे संशयीत रुग्ण सापडल्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याबाबत सरकारकडून काही बंधने घालण्यात आली आहेत. त्याचा परिणाम या महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. टोल नाक्यावरील वाहतूक 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाली असून, केवळ आवश्यक असलेल्या गाड्याच या नाक्यावरून जात आहेत.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. मात्र, पर्यटनासाठी किंवा प्रवासासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यातच यात्रा कंपन्यांच्या खासगी बस व्यवसायालाही या व्हायरसचा फटका बसला आहे. त्यामुळे व्यापारी, ट्रकचालक किंवा अगदी अतिमहत्त्वाच्या गाड्याच या टोलनाक्यावरून जात असल्याचे पथकर व्यवथ्यापक धनंजय पणशीकर यांनी सांगितले.