दिगंबर पडकर
बारामती तालुक्यात ऐन पावसाळ्यातील स्थिती; संकलनावरही परिणाम
चारा पडतोय कमी…बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ कार्यक्षेत्रात अद्यापही दुष्काळी स्थिती कायम आहे. पंचायत समितीच्या नोंदीनुसार बारामती तालुक्यात 13 हजार 363 पशुपालक आहेत. 13 हजार 464 लहान तर 46 हजार 632 मोठी जनावरे आहेत. त्यातही 85 हजार 647 शेळ्या-मेंढ्यांचीही नोंद आहे. यानुसार मोठ्या जनावरांना प्रतिदिन 15 ते 18 किलो चारा, लहान जनावरांना दररोज 7 ते 10 किलो प्रतिदिन चाऱ्याची गरज असते, यानुसार प्रतीदिन जवळपास 782.513 टन चाऱ्याची गरज भासत असून तशी मागणी होत आहे. मात्र, चारा कमी पडत आहे.
माळेगाव – बारामती तालुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठलेली नाही. त्यातच पाटबंधारे खात्याने कालव्याची आवर्तने बंद केली आहेत. पाऊस नसल्याने विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ओढे-नाले असे पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेतीकरिता पाण्याची टंचाई भासत आहे. ऐन पावसाळ्यात शेतीला दुष्काळाची झळ बसू लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यातून चारा लागवडी खालील क्षेत्र घटल्याने दुध उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे.
बारामती तालुक्याच्या अनेक भागात अद्यापही तुरळक पाऊस झाला आहे. माळेगाव, पणदरे आदी भागातही पावसाचे प्रमाण नगण्य आहे. शेतकऱ्यांनी दोन ते तीनवेळा शेतीची मशागत केली आहे. मात्र, पेरणी योग्य पाऊस नाही. तालुक्याच्या जिरायती भागात सलग सहाव्या वर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. नीरा डाव्या कालव्याचे पाणीही जलसंपदा खात्याच्या आदेशानुसार बंद केलेले होते. याचाही फटका तालुक्यातील बागायती गावांतील शेतीवर झाला आहे. यामुळे ऊसासारखे नगदी पीक नव्हे तर खरीप हंगामातील कमी पाण्यावरील येणारी पीकेही शेतकऱ्यांनी घेतलेली नाहीत.
बारामती तालुक्याचा माळेगाव पट्टा पूर्णत: बागायती समजला जातो. माळेगाव, पणदरे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते.
हा भाग नीरा डाव्या कालव्यावर अवंलबून आहे. या परिसरात अंदाजे 30 ते 35 हजार एकर ऊसाची नोंद कारखान्याच्या शेतकी खात्यावर होत असते. परंतु, कालव्याचे आवर्तनच बंद होत त्यामुळे या भागात नव्याने ऊसाची लागवड झालेली नाही. नीरा डावा कालव्यावर बारामती शहर परिसरासह काटेवाडी, भवानीनगरची शेतीही अवंलबून आहे. परंतु, येथेही ऊसाचे क्षेत्रात घटणार आहे. या क्षेत्रातील जवळपास 30 ते 40 टक्के ऊसक्षेत्राची घट होण्याची शक्यता श्री छत्रपती कारखान्याच्या शेतकी खात्याकडून व्यक्त केली गेली आहे. नीरा डाव्या कालव्यावर आधारीत जवळपास 70 टक्के क्षेत्रावरील ऊस लागवड होणार नसल्याची
चिन्हे आहेत.
चारा टंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर निश्चित झाला आहे. यातून संकलनावरही फरक पडला आहे. दैनंदिन संकलनात 15 ते 25 टक्क्यांनी घट आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
– बाळासाहेब तांबे, संचालक , चैतन्य डेअरी (बारामती दूध संघ, संकलक)