दौंड तालुक्यातीलशेतकऱ्यांच्या नजरा नुकसान भरपाई व कर्जमाफीकडे
कुरकुंभ- सध्या वातावरणात बदल होऊन दिवसभर हवामान ढगाळ राहत असल्याने दौंड तालुक्यातील रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या अनुदानाकडे लागल्या आहेत. यंदाचा खरीप हंगाम वाया गेल्याने रब्बीत ज्वारी, गहू, कांदा, मका, तूर, सूर्यफुल अशा घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांवर सततच्या ढगाळ हवामानामुळे लष्करी अळी, खोड किडी, मावा किडीने आक्रमण केल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
या परिसरातील चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.परतीच्या पावसाने दौंड तालुक्यातील काही भागात पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी ज्वारी पिकाला चिकटा पडायचा मात्र काही भागात ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. ही अळी ज्वारीची पाने कुरतडत असल्याने बळीराजा हैराण झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीच्या ज्वारीची पेरणी केलेली आहे; परंतु अशा ढगाळ वातावरण बदलामुळे या अळ्यांना पोषक वातावरण मिळून त्यांचा फैलाव झपाट्याने होताना दिसून येत आहे. यंदा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खते आणि मजुरीचा खर्च व उत्पादनात घट होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा ताळमेळ चुकत आहे.
- हवामानाच्या या लहरीपणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. मका आणि ज्वारीच्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेती व्यवसाय अडचणीत आल्याने नवीन सरकारच्या कर्ज माफीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
– राहुल शितोळे, शेतकरी, कुरकुंभ